केरळ : केरळला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळात अनेक ठिकाणी पूर आले असून काही ठिकाणी दरडसुद्धा कोसळली आहे. पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.


आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार इडुक्की मध्ये दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कन्नुरमध्ये दोघांचा आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

सध्या वायनाड आणि कोझीकोडे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. एनडीआरएफची टीम कोझीकोडला रवाना झाली आहे. इडुक्कीमध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपातकालीन समयी केंद्र सरकारकडून केरळला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले.


केरळ राज्यातील पूरस्थिती गंभीर असून, राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच एकाच वेळी 24 धरणांचे दरवाजे उघडावे लागले, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली.