नवी दिल्ली : मागील चार वर्षात भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांच्या पगारावर 155.4 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. राष्ट्रपती भवनाच्या पोलिस उपायुक्तांनी ही माहिती दिली. 'टाइम्स ऑफ इंडियाने' यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे.


लखनौचे आरटीआय कार्यकर्ते नुतन ठाकूर यांन या खर्चाशी संबंधित आरटीआय अर्ज दाखल केला होता. त्याच्या उत्तरात डीसीपी ऑफिसकडून सांगण्यात आलं की, "आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांच्या पगारावर 38.17 कोटी रुपये खर्च झाले होते. अशा प्रकारे 2015-16 मध्ये 41.77 कोटी रुपये, 2016-17 मध्ये 48.35 कोटी रुपये आणि 2017-18 मध्ये 27.11 कोटी रुपये खर्च झाले आहेत."

याशिवाय चार वर्षात सुरक्षा रक्षकांना दिलेल्या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 64.9 लाख रुपये खर्च आला आहे. यात 2014-15 मध्ये 15.5 लाख रुपये, 2015-16 मध्ये 20 लाख रुपये, 2016-17 मध्ये 21.8 लाख रुपये आणि 2017-18 मध्ये 7.5 लाख रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.

या खर्चात या गाड्यांमध्ये वापरलेल्या इंधनाच्या खर्चाचा समावेश नाही. राष्ट्रपतींच्या सुरक्षेत किती जवान तैनात आहेत, याची माहिती सुरक्षा कारणामुळे डीसीपी ऑफिसने जाहीर केली नाही.