नवी दिल्लीः सप्टेंबरपासून रेल्वेच्या आयआरसीटीसी या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विम्याचं कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांना हा विमा असेल, अशी माहिती आयआरसीटीसीचे चेअरमन ए. के. मनोचा यांनी दिली.


 

 

प्रवाशांना तिकीट बुकींग करताना एक रुपयांचा प्रिमिअम भरावा लागेल. ही विमा योजना सध्या प्रक्रियेत आहे. सप्टेंबरपासून रेल्वे प्रवाशांना हे विमा कवच असेल, अशी शक्यता मनोचा यांनी वर्तवली आहे. अपघात झाल्यास विमा कंपनीद्वारे उपचाराचा खर्च देण्याचीही यामध्ये तरतूद असल्याचं मनोचा यांनी सांगितलं.

 

 

या विमा योजनेसाठी श्रीराम जनरल, रायल सुंदरम आणि आयसीआयसीआय लोंबार्ड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेसाठी एकूण 19 कंपन्या विचारात घेतल्या होत्या. त्यापैकी 3 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्या प्रवाशांना विमा उपलब्ध करुन देतील, अशी माहिती मनोचा यांनी दिली.