मुंबई : बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. कारण यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. शिवाय, पाऊसकाळ चांगला राहण्याची शक्यता वाढली आहे.


ला नीनाची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि पाऊस चांगला होईल, असे असं हवामान खात्यानं म्हंटलं आहे.

ला नीना कधी निर्माण होईल माहित नाही, मात्र ते तसेच सुरु राहिलं, तर ते भारतातील मान्सूनसाठी चांगलं असेल, असे मत पुण्यातील इंडियन इन्स्टीट्युट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीमधील (IITM) वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. कृष्णन यांनी मांडले. शिवाय, येत्या काही महिन्यात ला नीना कमजोर झाला, तरी मान्सूनवरील प्रभाव सर्वसामान्य असेल.

ला नीना कमजोर झाला, तरी अल नीनो निर्माण होण्यास काही महिन्यांचा कालावधी जाईल, असेही आर. कृष्णन म्हणाले.