Hingoli Agriculture News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना (Tokai Sahakari Sakhar Karkhana) जप्त करण्याचे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 23 कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळं शेखर  गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा साखर कारखाना जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. 


समिती स्थापन करुन कारखान्याच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश


शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे थकल्याने टोकाई सहकारी साखर कारखान्याला जप्तीचे निर्देश दिले आहेत. भाजप नेते शिवाजी जाधव हे टोकाई कारखान्याचे अध्यक्ष आहेत. अनेक दिवसापासून ऊस उत्पादक शेतकरी त्याचबरोबर तोडणी आणि वाहतूक खर्च असे एकूण 23 कोटी रुपये टोकाई कारखान्याकडे थकीत आहे. ही थकीत रक्कम देणं शक्य नसल्याचं एक पत्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना लिहिलं होतं. त्या पत्राची गंभीरपणे दखल घेत साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना टोकाई सहकारी साखर कारखाना जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. आता याप्रकरणी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी तीन सदस्यीय समिती तयार करुन साखर कारखान्याच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


पैसे न मिळाल्यानं शेतकरी अडचणीत


दरम्यान, कारखान्याच्या संपत्तीच्या लिलावासंदर्भात कार्यवाही केली जाईल अशी माहिती हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतू कारखान्याला ऊस दिलेल्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न यामुळं निर्माण झाला आहे. कारण जानेवारी महिन्यात कारखान्याला ऊस दिलेल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळं शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.  शेतकरी अपार कष्ट करुन ऊस पिकवतात. मात्र हा ऊस कारखान्याला दिल्यावर त्यांनी त्याचा मोबदला वेळेवर दिला जात नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यामुळं आमदार नवघरे यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. शेतकऱ्यांना मोबदला तर मिळालाच नाही, शिवाय बगॅस आणि मोलासेस देखील खुल्या बाजारात विकण्यात आले आहेत. याची देखील चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असं नवघरे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता सहकार आयुक्तांनी हिंगोलीचा टोकाई सहकारी साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यावरर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. काही कारखान्यांनी गाळप बंद देखील केलं आहे. अशातच काही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची देणी न दिल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


shahu karkhana kagal : सलग दुसऱ्या वर्षी 'शाहू' ठरला देशातील सर्वोत्तम साखर कारखाना! आतापर्यंत तीनदा बहुमान