Hingoli News: हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर काल शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 11 जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले आहे. तर यावर प्रतिक्रिया देतांना आमदार बांगर यांनी संताप व्यक्त करत शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. तर हल्ला झाला त्यावेळी माझ्यासोबत कुटुंबातील सदस्य नसते तर हल्ला करणाऱ्यांचे एक घाव दोन तुकडे केले असते, असे बांगर म्हणाले. 


यावेळी बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणारे शिवसैनिक असूच शकत नाही. एखाद्या चोराप्रमाणे आलेल्या लोकांनी हल्ला केला असल्याने हल्ला म्हणता येणार नाही. माझ्यासोबत माझी पत्नी आणि बहिण होती. पण जर ते माझ्यासोबत नसते तर हल्ला करणाऱ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले असते. मी एकटा असतो तर हल्ला करणाऱ्यांचे एक घाव दोन तुकडे केले असते, असे बांगर म्हणाले. 


फक्त गाडीला टच करून दाखवा...


माझ्या गाडीला त्यांनी फक्त टच करून दाखवावे असे आव्हान मी त्यांना दिले होते आणि आजही त्यांना माझे हेच आव्हान असणार आहे. त्यांनी फक्त माझ्या गाडीच्या काचेला टच करून दाखवावे. असे पाठीमागून येणं म्हणजे लहान मुलांच्या खेळासारखं झालं आहे. जर हल्ला करायचाच होता तर त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं आम्ही तुमची गाडी अडवत आहोत. त्यांना उत्तर दिले असते असेही आमदार बांगर म्हणाले. 


हल्ला प्रकरणी 11 जण ताब्यात....


शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच हल्ला करणाऱ्या 11 जणांना ताब्यात सुद्धा घेतले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना विरोधात शिंदे गट वाद पाहायला मिळाला आहे.