हिंगोली: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या मतदारसंघातील कसबे दवंडा या गावात असताना हा हल्ला झालेला आहे.  प्रज्ञा सातव यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  


आमदार प्रज्ञा सातव या आज हिंगोली दौऱ्यावर होत्या. कसबे दौंड या गावांमध्ये त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी असून त्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत. दौऱ्यादरम्यान अशा पद्धतीने अचानक हल्ला कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट नाही. 


Pradnya Rajeev Satav Facebook : प्रज्ञा सातव यांची फेसबुक पोस्ट


आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना  माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.


या प्रकरणी आमदार प्रज्ञा सातव यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आज संध्याकाळी 8 वाजता कसबे दवंडा या गावी असताना एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीजवळ आला. नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी असताना, मी भाषण देत असताना एक व्यक्ती मागून आला, मला त्यानं ओढलं आणि हल्ला केला. समोर असलेल्या लोकांनी या व्यक्तीला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. 


Pradnya Rajeev Satav: काय म्हटलंय प्रज्ञा सातव यांनी?


आमदार प्रज्ञा सातव यांनी ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती देताना म्हटलंय की, एक अज्ञात व्यक्तीने मागून माझ्यावर हल्ला केला. हा जोरदार हल्ला होता आणि माझ्या जीवाला धोका आहे. एका महिला आमदारावरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. समोरून लढा, मागून भित्र्यासारखा हल्ला करु नका.


 








ही बातमी वाचा: