Hingoli Farmers Agitation : मुसळधार पावासामुळं राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी देखील खरवडून गेल्या आहे. हिंगोली जिल्ह्याला देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर राज्य शासनानं नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचं जाहीर केलं. पण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदतीपासून वंचित रहावं लागलं आहे. त्यामुळं गेल्या सहा दिवसापासून शेतकरी गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. आज संपावर असलेले शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.


40 ते 45 गावातील शेतकरी मदतीपासून वंचित


जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. परंतू या मदतीपासून सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना वंचित रहावे लागत आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळं या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळं गेल्या सहा दिवसापासून गोरेगाव येथील सर्व शेतकरी संपावर गेले आहेत. राज्य शासनानं अद्यापही या संपाची दखल घेतली नाही. त्यामुळं गोरेगावमधील शेतकरी आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आज शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तत्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांच्या यादीत समावेश करावा. तसेच तत्काळ मदत द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी  केली आहे.




अतिवष्टीचा शेती पिकांना मोठा फटका, आजही राज्यात पावसाचा अंदाज


दरम्यान, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडला आहे. या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया गेली आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर असणार आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: