सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुका ज्वारीच कोठार म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो. मंगळवेढ्याचं ग्रामदैवत म्हणजे दामाजीपंत. दामाजीपंतांची नगरी अशीच मंगळवेढा तालुक्याची ओळख आहे. वयाच्या 40 व्या वर्षी पंढरपूरच्या पाडूरंगाचे दर्शन घेण्याचा योग दामाजींना प्रथम आला. पंढरपूरचा दिव्य सोहळा पाहून ते वारकरी पंथाचे अनुयायी झाले. पांडूरंगाचे निस्सीम भक्त म्हणून धार्मिक गोष्टींकडे विशेष लक्ष देऊ लागले.


गीतेच्या पठणाबरोबरच ज्ञानेश्वरीचं वाचनही ते आवडीने करू लागले.  हुशार, संत प्रवृत्तीचा अधिकारी म्हणून दामाजीपंतांची ख्याती झाली. दामाजी पंत लोकसेवक असले तरी विठ्ठलाचे निस्सीम भक्त बनले. त्यांनी केलेल्या लोकोद्धाराच्या कामामुळे त्यांना संतपद प्राप्त झालं आणि आज मंगळवेढा नगरीत एका भव्य मंदिरात दामाजींची पूजा होते.



दामाजीपंतांचा चेहरा श्रध्दाळू व भाविक दिसत असे. वरिष्ठांचीही त्यांच्यावर मर्जी बसली. अहमदशहावल्ली या बादशहाने दामाजीपंतांची बढती मंगळवेढा येथे नायब तहसीलदार म्हणून केली. मंगळवेढ्याला दामाजीपंत तहसीलदार म्हणून सन 1458 ते 1460 पर्यंत काम करीत होते. दुर्दैवाने याच काळात  दोन वर्षांचा भीषण दुष्काळ मंगळवेढ्याच्या पंचक्रोशीला सोसावा लागला.

मंगळवेढ्याच्या आसपासचा सर्व मुलूख दुष्काळाच्या खाईत लोटला गेला. पंढरपूर, सोलापूर, सांगोला, विजापूर या भागातील सामान्य जनता  भूकेने मरणासन्न झाली होती. घरातलं धान्य संपले म्हणून लोक भीक मागू लागले. दामाजीपंतांनी कोणताही विचार न करता शासकीय गोदामे लोकांसाठी खुली केली. आजही दामाजीपंताचे ते उपकार मंगळवेढ्याची जनता विसरलेली नाही.

बादशहाच्या गोदामातील धान्य दुष्काळी जनतेला खुली केल्याची चर्चा सर्वदूर पसरली. मंगळवेढ्याला गेल्यास पोटभर खायला मिळतं, ही बातमी वणव्यासारखी पसरली. एक वेळचं जेवण मिळावं म्हणून बारा-बारा मैल चालत लोक मंगळवेढ्याला येऊ लागले. लोक शेकडोंच्या जमावानं येऊ लागले. दामाजीच्या दातृत्वाची खबर बादशहा हुमायूनशहा याला मिळाली. त्याने दामाजीपंतांना बेड्या ठोकून आणण्याचे फर्मान सोडलं.

विठ्ठल महिमेचा आणि विठ्ठल भक्तीच्या हाच कसोटीचा काळ होता. डोक्यावर फाटकं मुंडासं, मळलेलं फाटकं धोतर, खांद्यावर घोंगडी, पायात फाटक्या वहाणा, हातात घुंगराची काठी आणि कपाळावर गंधाचा टिळा या रुपात साक्षात  पांडूरंग बिदर दरबारात दाखल झाला. " मी मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांचा प्रामाणिक नोकर आहे. मला विठू महार म्हणतात. माझ्या धन्यास  दुष्काळाने झालेले जनतेचे हाल पाहावेनात, म्हणून हुजूर त्यांनी आपल्या ताब्यातील धान्यांनी भरलेली कोठारातील धान्य विकून, असहाय जनतेचे प्राण वाचवले. त्या मोबदल्यात पैशाचा भरणा करण्यासाठी दामाजीपंतांनी मला पाठवले आहे." असे म्हणून विठू महाराने म्हणजेच पांडूरंगाने कमरेची पिशवी काढून बादशहाच्या दरबारात उघडली. त्यातून मोहरांचा प्रचंड ढिग पडला. पांडूरंगाने पैशाचा भरणा केल्याची पावती मागितली. आणि पावती मिळताच पांडूरंग दरबारातून अदृश्य झाले. तिकडे बादशहाचे लोक दामाजीपंतांना घेऊन दरबारात हजर झाले. पण पांडुरंगाने पाठवलेला नजराणा पाहून खूष झालेल्या बादशहाने सत्कार करून दामाजींना सन्मानपूर्वक परत मंगळवेढ्याला पाठवले. हा आहे विठ्ठल भक्तीची महिमा.

मंगळवेढ्यात आलेला वारकरी, भाविक, वाटसरु तृप्त होऊन जावा असा दामाजीपंत मंदिराचा प्रयत्न असतो. त्यासाठी बारा महिने अन्नछत्र चालवलं जातं. भाविकांच्या जेवणाची आणि मुक्कामाची सोय या मंदिरात आहे.

यामुळे पंढरपूरला मंगळवेढ्याहून वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर जाऊ लागली. स्वत: दामाजीपंतानी पांडूरंगाच्या भक्तीकरीता लोकांना प्रोत्साहन दिलं.  मंगळवेढ्यामध्ये  भजनी मंडळी व वारकरी संप्रदाय यांचा फार मोठा प्रसार झाला. मंगळवेढ्याचा दामाजीपंतांचा वाडा हे वारकऱ्यांचं आश्रयस्थान झालं. दिंड्या, भजनी मंडळी मंगळवेढ्यास राहून दामाजी पंतांचं दर्शन घेऊन पंढरपूरला जाऊ लागली. आजही तीच परंपरा चालू आहे. पंढरीला जाता येता संत दामाजींच्या चरणी वारकरी नतमस्तक होतो. सरकारी अधिकाऱ्याचं मंदिर आणि तेही एखाद्या तालुक्याचं ग्रामदैवत असण्याचं राज्यातलं हे एक दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल.