सोलापूर: प्रत्येक गावातील मंदिर आणि मठाचं ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्व असतं. पण या मठ-मंदिराव्यतिरिक्त दुधाचा मठ आणि तुपाचा मठ हे नाव कधी तुम्ही ऐकलंय का? अत्यंत आगळं-वेगळं असं हे विरक्त मठ सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर गावातमध्ये आहे. या मठात आजही माणुसकीसोबतच एकोपा, स्त्रियांचा सन्मान आणि स्वाभिमानी जीवन पद्धतीची शिकवण दिला जाते. त्यामुळेच माणुसकी आणि समानतेचे दर्शन घडवणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील नागणसूरच्या बसवलिंगेश्वर देवस्थानची कीर्ती सर्वदूर पसरली आहे.


अक्कोलकोट तालुक्यात नागणसूर हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेला जोडणार एक महत्त्वाचं ठिकाण आहे. 1905 सालापासून बसवलिंगेश्वर महाराज या गावात वास्तव्याला होते. आपल्या वास्तव्याद्वारे त्यांनी सदाचार आणि समानतेची शिकवण समाजाला दिली. सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यांनी प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात रुजवला. आजही त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या विरक्त मठात मानवतेची नित्य आराधना होते.

गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या बसवलिंगेश्वर महाराजांच्या जीवनातली एक आख्यायिका आजही सांगितले जाते. 1932 साली महाराजांना प्लेगच्या आजाराने ग्रासलं होतं. प्लेगविषयी त्याकाळी समाजात कमालीची भीती होती. त्यामुळे गावातील लोकांना प्लेगची बाधा होईल, म्हणून त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. पण गावकऱ्यांनी विरोध केला. प्लेगची साथ पसरुन गावकऱ्यांच्या जीविताला धोका होऊ नये, यासाठी त्यांनी गाव सोडलं आणि कर्नाटकातील गुलबर्गा जवळच्या एका गावात वास्तव्य केलं. काही दिवसांतच त्यांनी देह सोडला. पण गाव सोडताना त्यांनी नागणसूर गावात कायम सदाचार आणि माणुसकी नांदेल याचं वचन ग्रामस्थांकडून घेतलं. आजही या वाचनाचं पालन येथील ग्रामस्थ नित्यनेमानं करतात.

बसवलिंगेश्वर महाराजांच्या स्मरणार्थ नसाणपूर गावात पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावेळी गावात मोठी यात्राच भरते. या यात्रेला माहेरवाशिणींची मोठी गर्दी असते. माहेरी आलेल्या प्रत्येक लेकीला पुरण पोळी आणि तुपाचा प्रसाद दिला जातो. गावच्या लेकीचा गावाने केलेला हा जणू सन्मान असतो. माहेरच्या या सन्मानाने आणि अगत्याच्या पाहुणचाराने प्रत्येक महिलेच मन गहिवरून येते. बसवलिंगेश्वरांनी स्त्रियांचा आदर करण्याची दिलेली शिकवण म्हणजेच माहेरच्या लेकीचा हा पाहुणचार असल्याचं मत येथील ग्रामस्थ दिपाली भाविकट्टी सांगतात.

महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला अक्कलकोट तालुक्यातील गावागावातले लोक तर येतातच. पण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होतात. सगळ्यांच मुख्य आकर्षण असत ते तूप आणि पुरण पोळीचं. मनसोक्त प्रसाद सेवन करून, आपल्या आप्तेष्टांना हा प्रसाद घेऊन जाण्याची परंपरा आहे.

याशिवाय प्रत्येक गोपालक या मठाला दूध आणि तुपाचे योगदान देतो. वर्षभर मठात अन्नछत्र सेवा चालू असते. मठात आलेला कोणीही पांथस्थ तहानेलाला आणि भुकेला परत जाऊ नये, ही इथली परंपरा आहे. सोहळ्याच्या दिवशी दूध आणि तुपाचा हंडा भरलेल्या असतो. जवळपास 50 हजाराहून अधिक भाविक तूप, दूध आणि पुरळ पोळीचा प्रसाद घेऊन तृप्त होतात.

समता, बंधुता, स्त्रियांचा सन्मान आणि श्रमाच महत्त्व या मठातून शिकवलं जातं. दूध, तुपाचा आहार शरीराला पोषक असतो. श्रमजीवी पद्धतीने स्वावलंबी जीवन जगता येत. हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारत गावकरी आपल्या श्रद्धास्थानाला नमन करतात. नागणसूर गाव शेतकऱ्यांच आहे. सकाळी उठून शेतात जाणे, शेतात राबणे आणि संध्याकाळी माठातल्या सत्संगात सहभागी होणे हा गावचा दिनक्रम असतो. लोकोद्धाराच काम करणाऱ्या एका महापुरुषाला देवत्व प्राप्त होत आणी तोच महापुरुष गावच ग्रामदैवत बनत हे सगळ अलौकिक आहे.