मुंबई : पीकविमा भरण्याची मुदत संपत आली तरीही अद्याप लाखो शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याची मुदत कधी वाढवणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मात्र तारीख वाढवण्याबाबत सकारात्म निर्णय होईल, अन्यथा मी स्वतः दिल्लीला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं.


पीकविम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विधानसभेत चांगलंच धारेवर धरलं. शेतकरी रांगेत ताटकळत असताना सरकार काहीच करत नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्याला उत्तर देताना मुदत वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

ऑनलाईनच्या घोळामुळे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, यवतमाळमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.

बीड जिल्ह्यातील खालापुरीमध्ये रांगेत उभं राहण्यावरुन वाद झाला आणि वादाचा रुपांतर भांडणात झालं. या भांडणात एका महिलेने 3 ते 4 जणांना चावा घेतला.

अनेक ठिकाणी शेतकरी काल रांगेतच झोपले,आणि सकाळी उठून पुन्हा रांगेत लागले. मात्र बँकांच्या पीकविमा भरुन घेण्याचा कालावधी पाहता असंख्य शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे सरकारने पीकविम्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.