नवी दिल्ली : दिल्लीतील जामियामध्ये गोळीबार होऊन आठवडा उलटत नाही तोच शाहीनबागमध्येही आज आंदोलनस्थळी गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शाहीनबागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात गेल्या दीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ज्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आलेत, तिथेच आरोपीनं येऊन हवेत गोळीबार केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव कपिल गुर्जर असं आहे. तो दल्लूपुरा गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी कपिलला पकडून सरिता विहार पोलिस ठाण्यात घेऊन गेले आहेत. धक्कादायक म्हणजे शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असता 'या देशात फक्त हिंदूंची चालणार, इतर कोणाची नाही' असं वक्तव्य केलं असल्याची देखील माहिती आहे.


दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं हा मुद्दा दिवसेंदिवस तापत आहे. गेल्याच आठवड्यात शाहीनबागमध्ये बंदुकधाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात शाहीनबागमध्ये आंदोलन सुरु असून आज तिथे गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. आंदोलन सुरु असल्याने बॅरिकेट्स उभारण्यात आले असून तिथेच हा गोळीबार झाला. यामुळं परिसरात खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला ताब्यात घेतलं

नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिकत्व नोंदणी विरोधातील आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून शाहीनबाग चर्चेत आहे, तसंच हा परिसर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मुद्दा बनू लागला आहे. शाहीनबागेतील आंदोलकांवरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे.

शाहीनबाग मधील गोळीबाराच्या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अमित शाहाजी, तुम्ही आमच्या दिल्लीची काय अवस्था केली आहे. इथं दिवसाढवळ्या गोळ्या चालत आहेत. कायदाव्यवस्थेची खुलेआम वाट लागली आहे. निवडणुका येत राहतील. राजकारण देखील चालत राहील. मात्र आपण कृपया दिल्लीच्या नागरिकांसाठी कायदा व्यवस्था व्यवस्थित करण्याकडे लक्ष द्या, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

राजधानी दिल्लीतील शाहीनबागमध्ये मागील 45 दिवसांपासून नागरिकता संशोधन कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचं नेतृत्व महिला करत आहेत. हे आंदोलन दिल्ली विधानसभेच्या पार्शवभूमीवर मोठा कळीचा मुद्दा बनत आहे.  आजच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील एका सभेत बोलताना केजरीवाल सरकार शाहीनबागमधील आंदोलकांना बिर्याणी पुरवत आहेत अशी टीका केली होती.

WEB EXCLUSIVE | CAA, NRC Protest : शाहीन बागच्या आंदोलनाचा ग्राऊंड रिपोर्ट | ABP Mahja