अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहे. आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज न भरण्याचा निर्धार केला आहे.


कर्जमाफी फक्त थकीत कर्जदारांनाच का? आम्ही नियमित कर्ज भरुन चूक केलीय का? असा आरोप करत राहुरी तालुक्यातील अनेक गावात नियमित कर्ज थकवण्याचं आवाहन आता शेतकरी करत आहेत.

राहुरी तालुक्यातील वाबळेवाडी, वरशिंदे आणि इतर गावांनी आज विशेष ग्रामसभा घेऊन चालू कर्ज न भरण्याचा ठराव केला आहे. या ग्रामसभेत गावातील महिलांसह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. जोपर्यंत सरकार आमचे कर्ज माफ करणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचे कर्ज भरणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.

ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही त्यांना सरकार जर दीड लाख रूपये कर्जमाफी करत असेल तर आम्ही अडचणीत असतानाही आमचे कर्ज नियमित भरले. मात्र कर्जमाफी आम्हाला नाही तर केवळ थकीत कर्जदाराला का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

नियमित कर्ज भरण्यासाठी आम्ही पोटाला चिमटा घेऊन बँकेत पैसे भरले. मात्र सरकारने आमच्यावर अन्याय केला असून, आम्ही आता आमचं कर्ज भरणार नाही. इतर शेतकऱ्यांनीही आपले कर्ज माफ होईपर्यंत भरू नये असं आवाहन शेतकरी करत आहेत.

सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ 25% अनुदान जाहीर केलं आहे. तर थकीत कर्जदारांचे दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. हा नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्याय असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.