पिकावर फवारणी करताना विषबाधा, धुळ्यात शेतकऱ्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2017 01:52 PM (IST)
फवारणी केल्यानंतर त्रास होऊ लागल्याने दशरथ कोळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला.
धुळे : विदर्भानंतर आता खान्देशातही कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील शेतकऱ्याचा फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे. 25 सप्टेंबर रोजी फवारणी केल्यानंतर दशरथ कोळी (28) यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली. विषबाधा होऊन विदर्भातही 20 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा? कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात 20 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकरी विषबाधा झाल्यामुळे उपचार घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे चिनी बनावटीचे फवारणी पंप असल्याचं समोर आलं आहे. प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी आहे. पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तुषार फेकतो. या पंपातून निघणारे तुषार हलके राहत असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे. फवारणी करताना काय काळजी घ्याल? फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो. शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.. ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित बातम्या :