मुंबई : एबीपी माझाचा लोगो आणि ग्राफिक्स वापरून स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबत खोटी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एबीपी माझाने संबंधित व्यक्तीची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. ही खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत केल्यामुळे अमोल कोल्हे यांनी देखील संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. शरद पवारांच्या दबावामुळे मालिका बंद केल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे, जो की पूर्णपणे चुकीचा आहे. ही माहिती शेअर करताना एबीपी माझाचा लोगो वापरण्यात आला आहे, यामुळे एबीपी माझाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.


अक्षय देहनकर हा व्यक्ती एबीपी माझाचा लोगो, इमेजेस फोटोशॉप करुन बनावट तसेच समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर अर्थात 'फेक न्यूज' प्रसारीत करत आहे.अशी कुठलीही बातमी 'माझा'ने प्रसारीत केली नाही. त्यामुळे या व्यक्तीवर तातडीनं कारवाई करावी ही विनंती, अशी तक्रार एबीपी माझाने ट्विटरवरुन केली आहे. मुंबई पोलिसांनीदेखील याची दखल घेतली असून आम्ही आपली तक्रार संबंधीत विभागाकडे सुपूर्द करीत आहोत, असं म्हटलं आहे. दरम्यान एबीपी माझाकडून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे.



दरम्यान शरद पवारांनी कधीही मालिकेसंबंधात सूचना केलेल्या नाहीत. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही ते म्हणाले.



डॉ. कोल्हे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आली की, गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे अनेक पोस्ट्स सोशल मीडिया वर फिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मालिका रोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असताना मालिकेच्या आशयाबद्दल चुकीची माहिती पसरवणे दुर्दैवी आहे! प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा नक्कीच अधिकार आहे परंतु मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही.