Dhule Lok Sabha 2024 : धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अद्याप या जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही. महाविकास आघाडी कुणाला संधी देणार? याकडे लक्ष लागलेले असतानाच लोकसंग्राम पक्षाने महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे. 


धुळे लोकसभा निवडणुकीच्या (Dhule Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर लोकसंग्रामचे अनिल गोटे (Anil Gote) यांनी आपल्या पक्षाचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) लढवल्यास त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अनिल गोटे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ही निवडणूक लढवण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


अनिल गोटेंची डॉ. सुभाष भामरेंवर टीका


गेल्या दहा वर्षात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जाती-जातीत भांडणे लावली, आलेल्या निधीमधून दहा टक्के कमिशन घेतले याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केलेले नाही. धुळे आणि मालेगाव या दोन शहरांची अर्थव्यवस्था ही पॉवरलूमवर असून, टेक्स्टाईल पार्कसारखे प्रकल्प आणून या ठिकाणच्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या तरुणांना रोजगार मिळू शकला असता. सुभाष भामरे यांनी मनमाड, मालेगाव, धुळे, इंदोर, रेल्वे मार्ग सांगितला.  मात्र प्रत्यक्षात नरडाणा ते बोरविहीर असा तो मार्ग असून त्यात कुठेही मनमाड मालेगाव धुळे याचा समावेश होत नाही. यावरून एसटीच्या कंडक्टर इतकीदेखील अक्कल त्यांना नसल्याची टीका अनिल गोटे यांनी डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर केली आहे. 


ठाकरे गटाचा निश्चितच विजय होईल


धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लढवली तर मुस्लिम मतदार देखील त्यांना मतदान करतील व त्यांचा निश्चित विजय होईल याची खात्री आपण देत असल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले आहे. महायुतीच्या विरोधात उभा करण्यात येणारा उमेदवार हा स्थानिक असला पाहिजे. तसेच लोकांनी त्याला ओळखले पाहिजे, असं या घडीला घडेल हे सध्या तरी शक्य नाही. या मतदारसंघातील 60 ते 65 टक्के मतदान हा शेतकरी असून अब्दुल रहमान यांचे शेतकऱ्यांशी काय देणे घेणे आहे. त्यांना जर निवडणूक लढवायची होती तर त्यांनी काँग्रेसकडून लढवायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे


पैसे खर्च केले तर टॅक्सी ड्रायव्हरही सुभाष भामरेंचा पराभव करू शकतो 


डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला होणाऱ्या विरोधावर बोलताना अनिल गोटे म्हणाले की, निवडणुकीच्या एक दिवस आधी देखील उमेदवार बदलला जाऊ शकतो, भाजपाला एकेक जागा महत्त्वाची असून एक सुभाष भामरे गेल्याने त्यांना कुठलाही फरक पडणार नाही. मात्र एक जागा गेल्याने त्यांचे नुकसान होणार आहे. या वेळेला डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव पैसे खर्च केले तर टॅक्सी ड्रायव्हर देखील करू शकतो, असा विश्वास अनिल गोटे यांनी व्यक्त केला आहे. 


आणखी वाचा 


Dhule Lok Sabha 2024: धुळ्याचे माजी पोलीस अधीक्षक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; अब्दुल रेहमान यांच्या उमेदवारीमुळे राजकीय गणिते बदलणार?