Dhule Local News Updates : 25 वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रहिवाशी असणारी एक महिला घरातून बेपत्ता झाली होती. अखेर या महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात धुळ्याच्या सावली वृद्धाश्रमाला यश मिळाले आहे. आज आई आणि मुलाची तब्बल 25 वर्षानंतर भेट झाल्याचा सोहळा सावली वृद्धाश्रमात पार पडला.


सन 1998 साली भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवाशी असणारी हिराबाई निखारे ही महिला पतीच्या निधनानंतर घरातून बेपत्ता झाली होती. या महिलेला लक्ष्मण आणि देवांग ही दोन मुले आहेत. हिराबाई घरातून बेपत्ता झाल्या त्यावेळी लक्ष्मण सात वर्षांचा तर देवांग चार वर्षांचा होता. गेल्या अनेक वर्षांपासून हिराबाई यांचा कुठलाही शोध लागत नव्हता, घरातून बेपत्ता झाल्यानंतर हिराबाई ही महिला गेली काही वर्षे मनोरुग्णाच्या अवस्थेत बेवारसपणे विविध ठिकाणी फिरत होती. काही दिवस पैठण येथे राहिल्यानंतर या महिलेला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेली येथील एका वृद्धाश्रमात आणण्यात आले. त्यानंतर हिराबाई निखारे गेल्या दोन वर्षांपूर्वी धुळे शहरातील सावली वृद्धाश्रमात आल्या होत्या. मनोरुग्ण असणाऱ्या हिराबाई निखारे यांची राहण्याची तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचारांची सावली वृद्धाश्रमाचे संचालक आप्पा खताळ यांनी पूर्णपणे व्यवस्था केली. हिराबाई यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आले. या उपचारांना हिराबाईने प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना त्यांचे गाव कुटुंबीय आठवू लागले. 


दोन सप्टेंबर रोजी हिराबाई निखारे यांनी सावली वृद्धाश्रमाचे संचालक आप्पा खताळ यांना कुटुंबाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी त्यांना आपले गाव आपले कुटुंबीय आपली मुले याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे अप्पा खताळ यांनी धुळे जिल्हा पोलिसांच्या माध्यमातून भंडारा जिल्हा पोलिसांशी संपर्क साधत हिराबाईच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. हा शोध घेण्यात आप्पा खताळ यांना यश मिळाल्यानंतर त्यांनी देवांग आणि लक्ष्मण यांना त्यांच्या आई बाबत माहिती देत त्यांना घरी घेऊन जाण्यासंदर्भात विचारणा केली. मुलांनी देखील आईला घरी घेऊन जाण्यास तयारी दर्शवल्यानंतर आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हिराबाई निखारे यांना दोन मुले आणि दोन सुनांच्या स्वाधीन करत सावली वृद्धाश्रमाच्या संचालकांनी निरोप दिला. यावेळी वृद्धाश्रमाच्या वतीने साडी चोळी देऊन हिराबाई निखारे यांना निरोप देण्यात आला. 


तब्बल 24 वर्षानंतर आई आणि मुलांची झालेली भेट पाहून यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. आईला घरी घेऊन जाताना आम्हाला अतिशय आनंद होत असून यापुढे आम्ही आईचा सांभाळ करू, अशी प्रतिक्रिया हिराबाई यांचा मोठा मुलगा लक्ष्मण याने व्यक्त केली. दरम्यान, आज मला माझ्या घरी जाताना मनापासून आनंद होत आहे, मुलांसोबत आणि सुनांसोबत मला राहता येईल याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया हिराबाई निखारे यांनी व्यक्त केली...
 
गेल्या दोन वर्षांपूर्वी वृद्धाश्रमात आलेल्या हिराबाई यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. मात्र आज तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करताना आम्हाला अतिशय मनापासून आनंद होत असला तरी दुसरीकडे मात्र मुलीला सासरी पाठवताना होणारे दुःख आज आम्हाला होत असल्याची प्रतिक्रिया सावली वृद्धाश्रमाचे संचालक आप्पा खताळ यांनी यावेळी व्यक्त केली.