धाराशिव : मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरोधात ओबीसी असा वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यात तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर आता ओबीसी नेते आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन मराठा व ओबीसी समाजात मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दोन्ही समाजातील नेत्यांकडून एकमेकांना आरोप केले जात आहे. एवढंच नाही तर दोन्ही समाजाकडून जाहीर सभा घेऊन एकमेकांना आव्हान देखील देण्यात येत आहे. अशातच, या दोन्ही समाजात मी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर हे आज धाराशिव येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधतांनी त्यांनी हे वक्तव्य केले आहेत. 


जरांगेंना दोन महत्वाचे सल्ले...


पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,"मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचे असून, त्यांनी सरकारला जेरीस आणले आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं, कारण ते जरांगे यांचं घात करतील असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. मनोज जरांगे हे ज्या आंदोलनात चालतात, त्या आंदोलनात त्यांनी मोजकी लोक सोडून सामान्य लोकात जेवण केलं पाहिजे, असा देखील एक आगळावेगळा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. 


मोदींनी राजीनामा देऊन रामाची प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. 


भारत देशात धर्माचा प्रचार प्रसार करायला पाहिजे, पण त्या अगोदर आपण कुठल्या पदावर आहोत हे पाहायला हवेत. रामाची प्राणप्रतिष्ठा करायला विरोध नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. आपले पंतप्रधान पद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 


रोहित पवारांच्या ईडी कारवाईवर प्रतिक्रिया...


शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईवरून देखील अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपण काही केलं नसेल तर घाबरू नका, आपली संपत्ती जाहीर करा असं मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी रोहित पवार यांच्या ईडी कारवाईवरून व्यक्त केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


जरांगेंचं मुंबई आंदोलन रोखण्यासाठी मीरा रोड प्रकरण घडवण्यात आले; जलील यांचा आरोप