बीड : पीक विमा भरण्याची आज 4 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे, मात्र पीकविम्याची वेबसाईट डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पीकविम्यासाठी सरकारनं 31 जुलै ही मुदत दिली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांना आपला अर्ज या मुदतीत दाखल करता आला नाही, त्यामुळे केंद्राकडे विनंती करत 4 ऑगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती.




31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या. मात्र अनेक शेतकऱ्यांना या मुदतीत पीकविमा भरणं शक्य झाला नाही. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आज 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांना गेल्या तीन दिवसात अर्ज भरता आलेले नाहीत.



मुख्यमंत्र्यांनी 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर ही शेवटची मुदतवाढ असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज दाखल न केल्यास त्यांना मुकावं लागणार आहे.



याआधी म्हणजे 31 जुलै 2017 रोजी सरकारने 5 ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदत वाढवली होती. मात्र, 1 ऑगस्ट 2017 रोजी सुधारित शासन निर्णय सरकारने जारी केला आणि 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत वाढवल्याचे जाहीर केलं.

बिगर कर्जदार शेतकरी आज 4 ऑगस्टपर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने पीक विम्याच्या पोर्टलवर अर्ज भरु शकतील किंवा स्वत: शेतकऱ्यांनी थेट भरलेले अर्जही स्वीकारले जातील. याचसोबत शेतकऱ्यांकडे 31 जुलै किंवा त्यापूर्वीचं पीक पेरणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, बँका शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारू शकणार नाहीत. सरकारच्या जनसुविधा केंद्रांवर अर्ज स्वीकारले जातील.

कर्जदार शेतकऱ्यांचा विमा नियमित प्रक्रियेनुसार भरला जातो.

याआधी पीक विम्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2017 ही होती. मात्र, बँकांबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या, त्याशिवाय ऑफलाईन-ऑनलाईनच्या घोळामुळे आणखीच अडथळे निर्माण झाले. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवली होती.

संबंधित बातमी :

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक

पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली