मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या आणि उतरती कळा लागलेल्या राज्यातील काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नुकतीच हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हर्षवर्धन सपकाळ हे मंगळवारी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाचा (Maharashtra Congress President) पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हे सोमवारी मुंबईत दाखल झाले. एरवी प्रदेशाध्यक्ष म्हटले की, पक्षाची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या दिमतीला असते. मात्र, हर्षवर्धन सपकाळ सोमवारी खासगी कारने मुंबईत दाखल झाले. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी गिरगाव येथील नाना चौकात असणाऱ्या सर्वोदय आश्रमात मुक्काम केला. रात्रभर ते जमिनीवर झोपले. याबाबत त्यांना विचारलं असता , ते म्हणाले की, मी नेहमीच सर्वोदय आश्रमात थांबत आलोय. मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्याने मला नेहमीच सर्वोदय आश्रम भावत आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरंजामी आणि तालेवार नेत्यांचा पक्ष अशी प्रतिमा तयार झालेल्या  काँग्रेस पक्षातील हा बदल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेस पक्षातील आगामी बदलांची नांदी ठरणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.


नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांच्यासारख्या बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती. यापैकी एखाद्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद मिळेल, याची अनेकांना खात्री होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने सर्वांचे अंदाज चुकवत राजकीय लाईमलाईटपासून कोसो दूर असलेल्या आणि कोणाच्याही 'खिजगणतीत' नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.


गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षातील प्रमुख नेते हे सातत्याने तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडताना दिसत आहेत. या कचाट्यातून सुटण्यासाठी बहुतांश नेत्यांनी भाजपवासी होण्याचा मार्ग निवडला होता. जे नेते भाजपमध्ये गेले नाहीत ते एकतर तुरुंगात गेले किंवा त्यांनी तडजोड करत शांत बसण्याचा पर्याय निवडला. हीच गोष्ट ध्यानात घेऊन काँग्रेस हायकमांडने कोरी पाटी असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत. 


भाजपच्या जात आणि पैशांच्या राजकारणाचा आम्ही छेद करु: हर्षवर्धन सपकाळ


मी नेहमीच मूल्यांचे राजकारण करत आलो आहे. महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही तेच करणार आहे. प्रस्थापितांच्या गर्दीत मी कसा टिकेल, असा प्रश्न विचारला जात आहे. मी माझ्या कृतीतून या प्रश्नाचे उत्तर देईन. आम्ही भाजपच्या जातीच्या आणि पैशाच्या राजकारणाचा छेद करु. काँग्रेस पक्ष आजही लाईव्ह आहे. थोड्याफार दुरुस्त्या कराव्या लागतील. बलाढ्य शक्तींनाही पराभूत व्हावे लागले, हा जगाचा इतिहास आहे आणि भाजप त्याला अपवाद नाही. मला राज्यसभा, विधान परिषद काहीही नको पण पाच वर्षांनी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळायला हवे, हे माझे लक्ष्य असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी 'दैनिक लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 



आणखी वाचा


साध्यासुध्या चेहऱ्याला सिंहासनावर बसवलं, हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमून काँग्रेसचा मोठा मास्टरस्ट्रोक, भाजप चेकमेट!