आजपासून राज्यातील रेस्टॉरंट सुरू होत आहेत. हळूहळू इतरही गोष्टी सुरू होताना दिसत आहेत. अशा वेळी मंदिरे सुरू करण्याची मागणी होताना दिसते.


राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राज्यातील विविध धार्मिक गटांशी चर्चा करत आहेत आणि मंदिरे खुली करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे  शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. राज्यातील रेस्टॉरंट त्यांच्या 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक संस्थांच्या परवानगीने सुरु होणार आहेत मग मंदिरे कधी सुरू होणार या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले.

मुख्यमंत्र्यानी सुरवातीपासूनच सांगितले आहे कि राज्यात अनलॉकची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने राबवण्यात येईल. रेस्टॉरंट हे 50 टक्के क्षमतेने सुरू करु शकतो. पण मंदिरांच्या बाबतीत हे शक्य नाही असे ते म्हणाले. .याबाबत मुख्यमंत्री राज्यातील सर्व धार्मिक गटांशी चर्चा करत आहेत लवकरच मंदिरे  खुली करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरत निर्णय घेतील असे राऊत म्हणाले.

राज्यसभेचे खासदार संजय राऊत असेही म्हणाले की येत्या  बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना किती जागा लढवणार याचा निर्णय एक दोन दिवसात होणे अपेक्षित आहे. आमच्या बिहारमधील कार्यकर्त्यांना शिवसेनेने किमान 50 जागा लढवाव्या अशी मागणी केली आहे पण आमचा विचार 30 ते 40 जागा लढवण्याचा आहे. याबाबतीत एक दोन दिवसात निर्णय होईल असे राऊत म्हणाले.

बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे जर विधानसभेच्या निवडणूकीत उभा राहिले तर त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार का या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले 'किप वॉचिंग'. मी बिहारला जाणार आहे आणि तिथेच या प्रश्नाचे उत्तर देणार आहे असेही राऊत म्हणाले.

गुप्तेश्वर पांडेंनी बिहारचे पोलिस महासंचालक असताना सुशांतसिह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानी गेल्या महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आणि नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलात प्रवेश केला होता. बिहारच्या विधानसभा निवडणूका या 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात होणार आहेत आणि मतमोजनी 10 नोव्हेंबर रोजी मतमोजनी होणार आहे.

देशभरात मंदिरे खुली करण्याचा निर्णय याआधिच घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्याची मागणी याआधीच भाजप पक्षाने राज्यपालांना भेटून केली आहे. तसेच मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटून राज्यातील मंदिरे खुली करावी अशी मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पंढरपूरात जावून राज्यातील मंदिरे खुली करावी यासाठी आंदोलन केले होते.

संबंधित बातम्या


Unlock 5.0 | मद्यालये सुरु झाली; ग्रंथालये कधी उघडणार?


 

Unlock 5.0 | Temple Reopen | हे तर 'पब्ज अ‍ॅन्ड पार्टी गँग'चं सरकार : तुषार भोसले