शेतकरी नेते सरकारमध्ये, आता शेतकऱ्यांचे कल्याण होणार: मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2016 02:36 PM (IST)
पंढरपूर: 'शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे त्यासाठी थेट माल विक्रीचा निर्णय सरकारनं घेतला. मी बाजारपेठांच्या विरोधात नाही मात्र, शेतकऱ्याला मारुन बाजारपेठ जिवंत ठेवायची नाही.' असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. शेतकऱ्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे. तसेच येत्या दोन वर्षात ओलिताखाली ४ लाख हेक्टर जमिन आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांचे नेतेच सरकारमध्ये आल्याने आता शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे. असंही मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूरमध्ये कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते थाटात उदघाटन झाले. याचवेळी मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ खडसेही उपस्थित होते. यावेळी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. दरम्यान, बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप काल मागे घेण्यात आला. मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.