औरंगाबाद : एकीकडे तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मतदारसंघातून महायुतीतील बे-बनाव समोर येतोय. जसं सत्तारांनी लोकसभेला युतीधर्म निभावला तसाच युतीधर्म आम्हीही निभावणार असं सिल्लोड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे, भाजपाला वाटत असेल तर त्यांनी सिल्लोड मध्ये उभारावं, मी आजूबाजूच्या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभा करेल असा सज्जड दम सत्तारांनी दिलाय. त्यामुळे युतीतील धुसफुशीचा दुसरा अंक समोर आला आहे.


काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या अब्दुल सत्तारांनी आधी उद्धव ठाकरे आणि नंतर एकनाथ शिंदेंचा विश्वास जिंकला. पण आपल्याच सिल्लोड मतदारसंघातील भाजप नेत्यांचा विश्वास जिंकू शकले नाही. अब्दुल सत्तार जरी महायुतीत असले तरीही स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांचे नेतृत्व कधीच स्वीकारला नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आल्याचं दिसतंय.


सत्तारांना मदत न करण्याची भाजपची भूमिका


भाजप नेत्यांनी थेट सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत मदत करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तारांची अडचण वाढू शकते. पण जर भाजपने आपल्या विरोधात काम केल्यास, आपण देखील इतर मतदारसंघात त्याच पद्धतीने काम करू असा अप्रत्यक्षरीता सत्तारांनी भाजपला इशारा दिला आहे. सत्तार यांनी मराठवाड्यात भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करू अस म्हटलंय.


भाजप आणि सत्तार यांच्यातील दरी वाढली


लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. मात्र या पराभवाला अब्दुल सत्तार जबाबदार असल्याची भावना भाजप नेत्यांमध्ये आहे. तर आपल्या कार्यकर्त्यांनी दानवेंना मदत केली नाही असं सत्तार देखील म्हणाले होते.


अब्दुल सत्तार यांच्या याच वक्तव्यानंतर भाजप आणि सत्तार यांच्यातील दरी वाढत गेली. आता वाद थेट एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्यापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नावात सत्ता असणारे सत्तार भाजपच्या विरोधाला कसे शमवणार किंवा उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.


ही बातमी वाचा: