मुंबई : युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला भाजपकडून (BJP) कडाडून विरोध करण्यात आला.  रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच दिशा सालीयनचे फोटो असणारे पोस्टर घेऊन यावेळी आदित्य ठाकरेंचा निषेध करण्यात येत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 


संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे सध्या काही काम नाही. हा पक्ष भ्रमिष्ट पक्ष आहे. या राज्यात त्यांचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या आठ दिवसात 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले. त्यांना याबाबत प्रश्न विचारले की, ते बनावट प्रकरणे निर्माण करतात. जे स्वतःला भाजपचे कार्यकर्ते म्हणून घेतात ते कार्यकर्ते नसून ते पगारी नोकर आहेत. 


झेंडे फडकवणारे लोक पेड वर्कर्स


झेंडे फडकवणारे लोक त्यांचे पेड वर्कर्स आहेत. मग ते अशा प्रकारे महाविकास अधिकारी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटारड्या आहेत. खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत त्यांच्यावर महिलांनी आत्महत्या केल्याचे थेट आरोप आहेत. उद्धव ठाकरेंनी संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला होता ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळात बसले आहेत. आधी जाऊन फडणवीस यांना सांगा त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकालपट्टी करा आणि मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.


ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकणे


महाविकास आघाडीत ठाकरे कुटुंबीयांनाच का टार्गेट केले जात आहे? याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे. लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणे म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. आम्हाला काहीही फरक पडत नाही. यातून तुमचेच मुखवटे गळून पडत आहेत, असा टोला देखील त्यांनी यावेळी भाजपला लगावला आहे. 


वसंत चव्हाण हुकुमशाहीविरोधात उभे राहिले


नांदेडचे खासदर वसंत चव्हाण यांचे आज निधन झाले. संजय राऊत यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले की, नांदेडमध्ये भाजप आणि अशोक चव्हाण यांनी खूप ताकद लावली तरीही वसंतराव चव्हाण यांच्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता आणि काँग्रेस पक्षाचा विजय झाला. आम्ही सगळे त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. उद्धव ठाकरे देखील गेले होते. ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हाही त्यांची प्रकृती बरी नव्हती. पण, महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकूमशाहीचा पराभव व्हावा. नांदेडला लागलेल्या तो धुवून काढण्यासाठी ते त्यांची प्रकृती बरे नसतानाही ठामपणे उभे राहिले. नांदेडच्या जनतेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असे आम्हाला वाटले नव्हते. शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. एक सच्चा काँग्रेसचा  कार्यकर्ता जो हुकूमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला. पण, शेवटी दुर्दैवाने त्यांना आजाराने गाठले आणि ते आपल्यातून निघून गेले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा


Nitesh Rane: दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा काय रोल होता? नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल