छत्रपती संभाजीनगर: महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात संताप आणि चिंतेचे वातावरण असतानाच छत्रपती संभाजीनगर येथे एका डॉक्टर महिलेने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रतिक्षा प्रीतम गवारे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिक्षाने सात पानी चिठ्ठी लिहून आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. यामध्ये प्रतिक्षाने तिचा नवरा तिला कशाप्रकारे त्रास देत होता. त्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडल्याचेही तिने चिठ्ठीत नमूद केले आहे.


प्रतिक्षाने चिठ्ठीत पती आपल्या चारित्र्यावर सतत संशय कसा घेत होता, याबद्दलही सांगितले आहे. तसेच हुंडा आणि फर्निचरसाठी त्याने सतत तगादा लावला होता. या प्रकरणी  प्रतिक्षाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम शंकर गवारे असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


प्रतिक्षाने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नेमकं काय म्हटलं?


डिअर अहो, खूप प्रेम केल हो तुमच्यावर जिवापाड देत स्वत:ला विसरुन गेले. तुम्ही माझ्यासारख्या हसत्याखेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलंत. तुम्ही एका स्वावलंबी मुलीला dpen‌dent बनवलं. तुम्ही खूप स्वप्न घेऊन लग्न केले होते तुमच्याशी. हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील. करिअरमध्ये सपोर्ट करतील.आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर आज ही वेळ आणलीत तुम्ही माझ्यावर.


तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं, मी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी, भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा, म्हणून त्यांनाही त्यांनाही बोलत नव्हते जास्त. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला, नंबर बदलण्यासाठी वाद घातले, त्यासाठी पण तयार झाले.  पण तुमचे doubts काही संपतच नाही. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आहे आणि राहिल. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.


सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना  मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं.  


तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड  करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.


आणखी वाचा


गावातील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा, मिरज तालुक्यातील घटना