छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे बीड दौऱ्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्याची घटना घडली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 'एक मराठा, लाख मराठा', अशा घोषणा देत राज ठाकरेंचा ताफा अडवला. या राड्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आता यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माझी गाडी रोखणारी जरांगेंची माणसं नव्हती. तर ठाकरे आणि पवारांची होती, असा दावा केला आहे. 


राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटले की, 2006 साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका आहे. आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकषांवर द्यावे. त्यावर माझे म्हणणे आहे की, महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. देशात महाराष्ट्रासारखे दुसरे राज्य नाही. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातींचे राजकारण केले जात आहे आणि माथी भडकवली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


राज ठाकरेंचा दावा


ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यावरून राज ठाकरे म्हणाले की, माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता. त्यांचा विषय देखील नाही. त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. यातील दुर्देवी बाब म्हणजे काही पत्रकार या गोष्टीत सहभागी झाले झाले आहेत. मला त्यांची नावे देखील माहीत आहेत. योग्य ठिकाणी जातील आणि चौकशी होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 


विधानसभेचे राजकारण सुरू


ते पुढे म्हणाले की, काल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या पोरांनी मार मार मारलं. त्यावेळी नशिब पोलिसांनी अडवलं. तो ओरडत होता की, एक मराठा लाख मराठा. त्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचे माणसं आहेत. यामागून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर आले पाहिजे. सर्वांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरेंचा शरद पवारांवर आरोप 


दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केला आहे. दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उदयानंतर आले आहे. आज माझ्या दौऱ्यात त्यांनी व्यत्यय आणला. उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत, समाजात तेढ निर्माण करुन राजकारण यांना करायचे आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले. 


आणखी वाचा 


राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते पण ती पक्षाची भूमिका नाही : संजय राऊत