छत्रपती संभाजीनगर : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील तीन-चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. दरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्यात देखील अनेक भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली असून, या पाऊसामुळे बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. सध्यस्थितीत निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरमधून गोदापात्रात 13 हजार 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच, पुढील काही दिवस असाच पाऊस सुरु असल्यास पाण्याच्या विसर्गात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या 17 गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


मागील अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळाला. मात्र, पावसाळा संपत आला असतांना आता पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केले आहे. नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी वाढली असून, काही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. गंगापूरसह दारणा, पालखेड, कडवा ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी नांदूर मधमेश्वरच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास 16 हजार 655 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु, दुपारनंतर पाण्याचा विसर्ग कमी करून, 13 हजार 500 करण्यात आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वैजापूर तालुक्यातील 17 गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध जलसाठा


गंगापूर - 97 टक्के


कश्यपी - 89 टक्के


पालखेड - 97 टक्के


दारणा - 88 टक्के


भावली - 100 टक्के


मुकणे - 89 टक्के


वाकी- 82  टक्के


भाम- 100 टक्के


पुराच्या पाण्यात कुणीही उतरू नयेत...


नाशिकच्या वरील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पाऊस वाढल्यास विसर्ग देखील आणखी वाढवण्यात येऊ शकतो. तसेच, जोरदार पाऊस झाल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या दोन्ही बाजूच्या 17 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुराच्या पाण्यात कुणीही उतरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच या गावातील स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून, गावातच राहण्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे गोदावरी पात्रात दीड लाखाच्या वरती पाण्याचा विसर्ग झाल्यावर पुराचा धोका अधिक वाढतो आणि अनेक गावांना याचा फटका बसतो. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhajinagar Rain Update : तासाभरात मुसळधार पावसाने छत्रपती संभाजीनगरला झोडपून काढलं, रिक्षावर झाड कोसळलं