Aurangabad Metro Project : मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर औरंगाबाद शहरात देखील मेट्रो सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी याबाबत घोषणा केली होती. मात्र, आता औरंगाबाद (Aurangabad) शहरात होणे शक्य नसून, मेट्रोच्या नावाने औरंगाबादकरांना 'चॉकलेट' दाखवण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( न्हाई)  मेट्रोच्या प्रस्तावास नकार दर्शवित 3 हजार 737 कोटी खर्च करणार नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा जलील यांनी केला आहे. विशेष म्हणजे मेट्रोसाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआरसाठी खर्च करण्यात आलेले साडेसात कोटी वाया गेले असल्याचे जलील म्हणाले आहेत. 


औरंगाबादच्या वाळूज ते शेंद्रा दरम्यान मेट्रोसह अखंड उणपूल उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली होती. यासाठी अनेक बैठका झाल्या. त्यानंतर भागवत कराड यांनी या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटीच्या निधीतून सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याची सूचना केली. त्यास स्मार्ट सिटी सीईओंनी मंजुरी देत डीपीआरसाठी साडेसात कोटी मेट्रो रेल्वे कापीरेशनला दिले. मात्र आता या प्रकल्पाचा आराखडा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्मार्ट सिटीला परत केला आहे. अशा कुठल्याही प्रकल्पास मंजुरी नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले असल्याचे जलील म्हणाले आहे. त्यामुळे आता खर्च झालेले साडेसात कोटी मंत्री कराड आणि तत्कालीन स्मार्ट सिटी सीईओकडून वसूल करण्यात यावे अशी मागणी जलील यांनी केली आहे. 


शहरवासीयांना खोटे स्वप्न दाखवले... 


दरम्यान या सर्व प्रकरणावरून जलील यांनी मंत्री कराड यांच्यावर निशाणा साधला आहे. शहरात मेट्रो प्रकल्प राबविण्यासारखी परिस्थिती नसतांना, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना दिवास्वप्न दाखविण्याचे काम कराड यांनी केले. देशातील बहुतांश मेट्रो सेवा आर्थिकरीत्या डबघाईला आल्याचे चित्र आहे. मात्र, फक्त केंद्रीय राज्यमंत्री यांची मर्जी राखण्यासाठी स्मार्ट सिटीने मेट्रोचा प्रकल्प आणला असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तर, तांत्रिकदृष्ट्या या प्रकल्पाची अंमलबजावणी शहरात होऊच शकत नाही. या प्रकल्पासाठी निधी केंद्र शासन कधीच देत नाही. त्यासाठी एसपीव्ही स्थापन करावी लागते. तसेच, मेट्रोचा वाटा कोठून टाकणार? माझ्याकडे देशाच्या तिजोरीच्या चाव्या, बँका आहेत, असे म्हणणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री यांनी मेट्रोसाठी निधी आणून दाखवल्यास भर रस्त्यात उभं राहून त्यांना सलाम ठोकेन असे जलील यांनी खुले आव्हानच दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Metro: औरंगाबाद शहरातील पहिल्या मेट्रोचा डीपीआर तयार; 6800 कोटींचा खर्च अपेक्षित