छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून सोडण्यात आलेलं पाणी हे जायकवाडी (Jayakwadi) धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहचलं आहे. अहमदनगरच्या निळवंडे धरणातून हे पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे समन्यायी वाटपानुसार सोडण्यात आलं होतं. यामुळे जायकवाडी धरणात पाणी दाखल झाल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नाशिक धरणातून सोडण्यात आलेलं पाणी हे जायकवाडीत उद्या म्हणजेच मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे. 


बऱ्याच वाद आणि गोंधळानंतर अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दारणा धरणातून 100 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. त्याचपाठोपाठ अहमदनगच्या निळवंडे धरणातून देखील पाणी सोडण्यात आलं होतं.  निळवंडे धरणातून 100 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तसेच निळवंडे आणि भंडारदरा धरणातून 3.36 टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. 


कुठल्या धरणातून किती पाणी


शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), 0.5, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.


मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष


मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ज्यात नाशिक, नगरमधील गंगापूर, गोदावरी- दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातून हे पाणी सोडले गेले. मात्र,  8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरीही प्रत्यक्षात 5 टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. त्यामुळे 35 टक्के पाणी वाया जाणार आहे. तर, एकूण 5 टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी 44 ते 45 टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे.


मराठवाड्याला मोठा दिलासा


यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशात शेतीसाठी देखील पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकं धोक्यात आली आहे. त्यामुळे वरील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी होत होती. अखेर प्रत्यक्षात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा : 


Marathwada Water Issue : अखेर नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले, मराठवाड्याच्या 25 दिवसांच्या लढ्याला यश