Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे उपोषण करणार आहे. दरम्यान, आंतरवालीमधून मुंबईसाठी निघणाऱ्या पायी दिंडीसाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी मराठवाड्यातील अनेक मराठा आंदोलक आंतरवालीकडे निघाले असल्याचे चित्र आहे. 


मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीवरून अनेक मराठा युवक आंतरवाली सराटी आणि तेथून पुढे मुंबईकडे रवाना होणार आहे. यासाठी हे तरुण आजच आंतरवालीकडे निघाले आहेत. हिंगोली शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे युवक रवाना झाले आहेत. सोबत अन्नधान्य यासह बिस्किट पुडे आणि पाणी घेऊन हे युवक आंतरवालीकडे निघाले झाले आहेत. विशेष म्हणजे पुढील काही दिवस मुंबईत थांबण्याची वेळ आल्यास त्यासाठी लागणारे अन्नधान्य देखील सोबत घेऊन हे तरुण निघाल्याचे पाहायला मिळत आहे. 


मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया...


मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की,"सरकारने म्हणल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात शोधण्याचे काम सुरू आहे. मागासवर्ग आयोग नव्याने गठित केला आहे. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन बाबत विंडो ओपन झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने अगोदरच सांगितले आहे इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार आहोत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


सरकारच्या शिष्टमंडळातील सहा-सातजण कुठे गेलेत: जरांगे 


मुंबई आंदोलनापूर्वी मनोज जरांगे यांची देखील प्रतिक्रिया आली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात मनापासून लक्ष घालणे गरजेचं आहे, यावर त्यांनी तोडगा काढने गरजेचे आहे असे जरांगे म्हणाले. ड्राफ्टचा विषयच आमच्या डोक्यात नाही. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. नोंदीची प्रमाणपत्र मिळतील तेव्हाच सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाला अर्थ आहे. सुरवातीला उपोषण सोडवण्यासाठी आलेले सरकारच्या शिष्टमंडळातील सहा-सातजण कुठे गेलेत. मराठ्यांना आश्वासन देऊन गेलात, मराठ्यांना तुम्ही फसवून गेलात कुठपर्यंत तुम्ही लपून बसताल. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. लक्ष घालणार नसाल तर मग मात्र मी मुंबई सोडणार नाहीत. फडणीस साहेबांनी हे मनावर घेणं खूप गरजेचे आहे. हे सगळे फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेल आहे. फडणीस साहेबांनी यात रितसर मार्ग काढला पाहिजे. तसेच, उद्याची तयारी पूर्ण झाली असून, आता फक्त गाडीत बसायचं राहिलाय. उद्या 9 वाजता आंतरवालीमधून मुंबईला निघणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठा आरक्षणासाठी सरकार कुणबी नोंदीचा सांगत असलेला 54 लाखांचा आकडा फसवा : प्रकाश आंबेडकर