औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अतिवृष्टी आणि यंदा कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यासाठी उद्या औरंगाबाद शहरात राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. या बैठकीत सुमारे 40 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांचे पॅकेज जाहीर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषि महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल 7 वर्षांनंतर होणाऱ्या या बैठकीतून मराठवाड्याला खूप काही अपेक्षा आहे.


वेगवेगळ्या विभागांचे प्रस्ताव 



  • सिंचन विभाग : 21 हजार कोटी

  • सार्वजनिक बांधकाम विभाग :10 ते 12 हजार कोटी

  • ग्रामविकास विभाग : 1हजार 200 कोटी

  • कृषी विभाग : 600 कोटी

  • वैद्यकीय शिक्षण विभाग : 500 कोटी

  • महिला व बालकल्याण विभाग : 300 कोटी

  • शालेय शिक्षण विभाग : 300 कोटी

  • क्रीडा विभाग : 600 कोटी

  • उद्योग विभाग : 200 कोटी

  • सांस्कृतिक कार्य विभाग : 200 कोटी

  • नगरविकास विभाग : 150 कोटी


शेतकऱ्यांचे बैठकीकडे विशेष लक्ष...


गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात सतत अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. तर, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीकडे सर्वाधिक लक्ष शेतकऱ्यांचे असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी विभागाने 600 कोटीचा प्रस्ताव मुख्यंमत्री कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे या बैठकीतून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


निवडणुकीपूर्वीची बैठक महत्वाची ठरणार...


तब्बल सात वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. विशेष म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी ही बैठक होत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मतदारांना खुश करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच या बैठकीतून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्येक वेळेस अशा मोठ्या घोषणा होतात खरं, पण पुढे त्या पूर्ण होत नसल्याचं देखील अनेकदा पाहायला मिळाले आहे. 


बैठकीसाठी येणाऱ्या मंत्र्यांसाठी अलिशान हॉटेल बुक...


उद्या होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत जवळपास सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहे. काही मंत्री आजच येणार असून, काहीजण उद्या म्हणजेच 16 सप्टेंबरला मुक्काम करणार आहे. त्यामुळे या मंत्र्यांची राहण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच मंत्र्यांसाठी शहरातील रामा हॉटेलमध्ये 30 रूम बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीनिमित्ताने मंत्र्यांचा तामझाम पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Cabinet Meeting : रामा हॉटेल 30 रूम, ताज 40, अमाराप्रीत 70, नाशिक-औरंगाबादहून 300 गाड्या बूक; मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाड्यात तामझाम