Chhatrapati Sambhaji Nagar Water Supply : छत्रपती संभाजीनगर शहराला (Chhatrapati Sambhaji Nagar City) पाणीपुरवठा (Water Supply) करणारी मुख्य जलवाहिनी दोन दिवसांपूर्वी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दरम्यान असे असताना आता एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अतिक्रमणे हटवताना महापालिकेच्या जेसीबीचा धक्का लागल्याने फुटली आहे. यामुळे 24 तासांसाठी एमआयडीसीचं पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे याचा मोठा फटका उद्योजकांना बसणार आहे. 


महानगरपालिकेकडून शहरातील शहानूरमिया दर्गा चौकातील अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यान यावेळी कारवाई करताना जेसीबीचा धक्का लागल्याने एमआयडीसीची 700 मि.मी. व्यासाची जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला आणि यामुळे पाण्याचा मोठा फवारा उडू लागले. विशेष म्हणजे सुमारे 20 ते 25 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. सुमारे चार तास पाणी रस्त्यावर वाहून जात होते. ज्यामुळे लाखो लिटर पाणी नाल्यात वाहून गेले. तर ही जलवाहिनी फुटल्याने चिखलठाणा एमआयडीसी आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींना पुढील 24 तास पाणीपुरवठा होणार नसल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून  सांगण्यात आले सांगितले. 


700 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीसह नागरी वसाहतींना पाणीपुरवठा होतो. सिडको एन-1 येथील एमआयडीसीच्या जलकुंभातून महापालिकेला दोन एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर टँकर पॉईंटवरून दिवसभरात सुमारे चारशे टँकर पाणी विविध नागरी वसाहतींना पुरविले जाते. असे असताना शहानूरमिया दर्गारोडवरील दुकानांचे अतिक्रमणे हटवित असताना जेसीबीचा धक्का लागून या 700 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह गळून पडला. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पाण्याची नासाडी झाली आहे. तर दुरुस्तीचे काम सुरु आहे. 


पुढील 24 तास पाणी पुरवठा बंद


जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणीपुरवठा बंद केला. पूर्णपणे पाणी वाहने बंद झाल्यानंतर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी लागणारा वेळ गृहित धरून पुढील 24 तास चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद राहिल. दुरुस्तीनंतर गुरुवारी सकाळपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, नंतर नेहमीसारखा पाणीपुरवठा होईल, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


सतत जलवाहिनी फुटतायत...


छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून 1400 मिमी आणि 700 मिमी व्यासाच्या दोन मुख्य जलवाहिनी टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र या दोन्ही जलवाहिनी जुन्या झाल्याने अनेकदा फुटत असतात. मात्र अशात जलवाहिनी फुटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचं सामना करावा लागत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Water Crisis: पुन्हा पाण्याची बोंबाबोंब! छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली