छत्रपती संभाजीनगर : इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचं चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना गॅस जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.
LPG Gas Saving Appeal: गॅस काटकसरीनं वापरण्याचं आवाहन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅससाठी रांगा लागत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईच्या काळात जसं पाणी जपून वापरतो, तसंच गॅसही जपून वापरावं, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले. परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत प्रत्येक ग्राहकानं गॅसचा काटेकोरपणे वापर केला, तर सर्वांना गॅस पुरेसा उपलब्ध होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
LPG Shortage Maharashtra: गॅस एजन्सींची तपासणी सुरू
घरगुती गॅसबाबत नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही, असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. सध्याची टंचाई लक्षात घेता गॅस वापराबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील गॅस एजन्सींच्या तपासण्या सुरू असून यासाठी 11 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Film Industry Impact: मनोरंजन क्षेत्रालाही फटका
गॅस टंचाईचा परिणाम आता मनोरंजन क्षेत्रावरही दिसू लागलाय. मुंबईतील गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये शूटिंगदरम्यान जेवणात चपातीऐवजी पाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दररोज शूटिंग सेटवर मोठ्या प्रमाणात कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचारी उपस्थित असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो. मात्र इंधन तुटवड्यामुळे जेवणातील पदार्थ कमी करण्याचा निर्णय काही ठिकाणी घेण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Dhule News: मंगल कार्यालय चालकांची प्रशासनाकडे धाव
दरम्यान, धुळे जिल्ह्यात मंगल कार्यालय आणि लॉन्स चालकांनी सिलेंडर मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्यामुळं अनेक मंगल कार्यालयांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत, तर नियोजित विवाह सोहळे पुढे ढकलावे लागू शकतात, अशी भीती चालकांनी व्यक्त केली आहे.
Temple Langar Impact: मंदिरं आणि गुरुद्वारांतील अन्नछत्रावर परिणाम
एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम पुण्यातील मंदिरं आणि गुरुद्वारांमधील अन्नछत्रावरही दिसू लागलाय. या ठिकाणी दररोज हजारो गरजू लोकांना जेवण दिलं जातं. मात्र गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळं स्वयंपाकावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भंडारा किंवा लंगरमध्ये सध्या फक्त दाल आणि भात दिला जातोय, तर चपात्या देणं तात्पुरतं बंद करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.
ही बातमी वाचा:
