औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज (04 सप्टेंबर) बंदची हाक देण्यात आली आहे. ज्यात औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात आज बंद पाळला जाणार आहे. जालना येथील घटनेनंतर शनिवारी सकल मराठा समाजाची आणि मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक झाली. या बैठकीत आज औरंगाबाद बंदचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे, या बंदला एमआयएमसह (MIM) अनेक राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे.


जालना येथील घटनेचे पडसाद औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उमटताना पाहायला मिळत आहे. जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन देखील केले जात आहे. तर अनेक ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आला. दरम्यान, आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात आज बंद पाहायला मिळणार आहेत. तर या बंदमध्ये सहभागी होऊन जिल्ह्यातील व्यापारी आणि व्यवसायकांनी सहकार्य करण्याचे आव्हान सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.


क्रांती चौकात केली जाणार निदर्शनं...


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेनंतर ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी शहरातील क्रांती चौकात निदर्शने केली जाणार आहे. ठाकरे गटाकडून ही निदर्शने केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.


एमआयएमचा पाठिंबा....


जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली असताना, एमआयएम पक्षाने देखील याला पाठिंबा दिला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे लोकशाही मार्गाने मराठा बांधव आंदोलन करत होते. त्यांच्यावर अमानुषपणे बेछुट लाठीमार आणि गोळीबार करण्यात आलेला आहे. या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि दोषीं पोलिसांवर कठोर कारवाई होण्यासाठी सोमवारी 4 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने औरंगाबाद जिल्हा आणि इतर ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे. घडलेला प्रकार हा संतापजनक आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचा जाहीर पाठींबा आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांची सरकारने त्वरीत पूर्तता करावी. तसेच, सर्वसामान्य नागरीकांनी आपआपले आस्थापने बंद करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात येत असल्याचं जलील यांनी म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Jalna Update : जालन्यात सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश; गोपालकाला, मुक्तीसंग्राम मिरवणूक काढण्यावर निर्बंध