छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी व हिंगोलीत (Hingoli Rain) शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जोरदार पावसामुळे (heavy Rain) जायकवाडी धरण (Jayakwadi dam) जवळपास भरले आहे. जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी  पाणी सोडले जाईल. 


जायकवाडी धरणात 87 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने पाण्याची आवक वाढू शकते, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नये, असेही आवाहन पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पहाटेपासून कुठे जोरदार त कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे . पावसाचा जोर प्रचंड असल्याने पाचोड खुर्द आणि पाचोड या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांमध्ये नदी दुथडी भरुन वाहत आहे.


बीडमधील दगडी पुलावरून पाणी गेल्याने पेठ बीड व जुना बीडकडे जाणारी वाहतूक बंद


बीडमधील बिंदुसरा नदीला पूर आल्याने पेठ बीड व जुना बीड कडे जाणाऱ्या दगडी पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. आता या भागात जाण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. याठिकाणी असलेल्या दगडी पुलावरून जात असलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. कालच बिंदुसरा नदीकाठच्या सर्वच गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात अतिवृष्टी मुसळधार पावसाने शेत आणि रस्ते जलमय


जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये रविवारी दुपारनंतर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. शहर आणि तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावरती पाणी साचले असून शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे. तालुक्यातील सर्वच गाव पावसानं झोडपून काढले आहे. मंठा शहरात देखील रस्ते जलमय झाल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. पांगरी , पाटोदा, सांगवी गावासह 5-6 गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पांगरी गावचा संपर्क तुटल्यामुळे, गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. पांगरी आणि गावात पाझर तलाव पूर्ण क्षमेतेने भरल्याने तो फुटण्याची भीती निर्माण होऊ झाल्याने, गावातील कुटुंबाला जवळच असलेल्या उंचावरील मंदिरा सह इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आहे.



आणखी वाचा


पूर ओसरला! हिंगोलीतील नुकसानीचा ग्राऊंड रिपोर्ट