औरंगाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात (Marathwada) यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचा (Farmer Suicide) वेग प्रचंड वाढला असून, गेल्या आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. म्हणजेच दिवसाकाठी 2 ते 3 शेतकरी आत्महत्या होत आहेत. धक्कादायक म्हणजे हा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक समजला जात आहे. तर, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यंमत्रीपदाची शपथ घेतल्यावर सर्वात आधी राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असणार असल्याचा दावा केला होता. मात्र, आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्नही निरुपयोगी ठरताना दिसत आहेत. कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत म्हणजेच 1 जानेवारीपासून ते 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 685 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे. अंगावर शहारे आणणारा हा आकडा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक असल्याचे बोलले जात आहे. 

आत्महत्यांचा वेग चिंताजनक

गेल्या आठ महिन्यांत म्हणजेच 1 जानेवारी पासून ते 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 685 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे. दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात मराठवाड्यात 1 हजार 22 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती. असे असताना यावर्षी आठ महिन्यातच 685 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच मराठवाड्यातील आत्महत्यांचा हा वेग चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. 

तीन वर्षांची आकडेवारी...

  • 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या काळात मराठवाड्यातील 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.
  • 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या काळात मराठवाड्यातील 887 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.
  • 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात मराठवाड्यातील 1022 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

मागील आठ महिन्यातील आकडेवारी (1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2023)

अ.क्र. जिल्हा  आत्महत्या 
1 औरंगाबाद  95
2 जालना  50
3 परभणी  58
4 हिंगोली  22
5 बीड  186
6 लातूर  51
7 नांदेड  110
8 उस्मानाबाद  113
  एकूण  685

एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या...

औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.  कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे), फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नावं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

पावसाने पाठ फिरवली, 40 दिवसांत 7 शेतकऱ्यांची आत्महत्या; औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील परिस्थिती