Maharashtra Political News : काही दिवसांपूर्वी राज्यात एंट्री करणाऱ्या BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाने आता राज्यात आपला विस्तार वाढवला आहे. दरम्यान आता याच भारत राष्ट्र समिती पक्षाची एंट्री छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) झाली आहे. कारण माजी आमदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे (Raosaheb Danve) कट्टर विरोधक समजले जाणाऱ्या हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी BRS मध्ये प्रवेश केला आहे. नेहमी कोणत्या कोणत्या कारणांनी आणि रावसाहेब दानवे यांच्यासोबतच्या वादांनी जाधव नेहमी चर्चेत असतात. त्यात आता त्यांनी BRS मध्ये प्रवेश केला आहे.


नांदेड जिल्ह्यात आपली पहिली सभा घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या विस्ताराचे नारळ फोडले. त्यानंतर महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांनी अनेक मोठ्या चेहऱ्यांच्या शोध सुरु केला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी नांदेडमधील ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबत हातमिळवणी करत बीआरएस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच आता हर्षवर्धन जाधव यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. 


जाधवांचा बीआरएसमध्ये प्रवेश... 


कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय पक्षापासून लांब होते. दरम्यान, आता जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आहे. तर हैदराबाद येथे जाऊन हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचं बोलले जात आहे. तर त्यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची लवकरच छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आधी शंकरअण्णा धोंडगे आणि आता हर्षवर्धन जाधव यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात आपला पक्ष वाढवण्यासाठी चंद्रशेखर राव यांच्या प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे. 


जाधवांचा प्रवेश राजकीयदृष्ट्या विरोधकांसाठी डोकेदुखी...


हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही नवीन नाही. जाधव यांच्याकडून दानवे  यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. त्यामुळे भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश घेतल्यावर हर्षवर्धन जाधव यांच्याकडून दानवे यांच्यासह भाजपवर टीका होण्याची शक्यता आहे. तसेच गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत जाधव यांच्यामुळे शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार असलेले चंद्रकांत यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा जाधव यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यास याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


रावसाहेब दानवेंच्या कन्येकडून विधानसभेची तयारी: हर्षवर्धन जाधवांच्या विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता