Chhatrapati Sambhaji Nagar News : शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठा गाजावाजा करत 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) हे अभियान राबवले जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेतले जात आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून 'शासन आपल्या दारी' योजनाच्या सभा राज्यातील वेगवेगळ्या भागात घेतल्या जात आहेत. मात्र भाजपच्याच (BJP) एका आमदाराने 'शासन आपल्या दारी' योजनेची पोलखोल केली असून, शासकीय योजनांसाठी नागरिकांना कशा खेट्या माराव्या लागतात हे समोर आणले आहे. सोबतच अधिकारी सर्वसामान्य लोकांच्या फाईल वर्षानुवर्षी कशी अडकवून ठेवतात हे सुद्धा दिसून आले आहेत.


त्याचं झालं असे की, छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात वर्षभरापासून दाखल केलेल्या सिंचन विहीर व गोठ्याच्या तब्बल 700 फाइल धूळखात पडून आहेत. अधिकाऱ्यांकडून या फाइल मंजूर करण्यातच आल्या नसल्याने त्या पडून होत्या. त्यामुळे जोपर्यंत या फाइल मंजूर केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत माजी विधानसभा अध्यक्ष भाजप आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी घेतला होता. बागडे यांनी थेट पंचायत समितीमध्येच आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. विशेष म्हणजे आज (24 जून) रोजी आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करायचे होते. मात्र अधिकारी फाईलवर सही करत नसल्याने हे सर्व प्रकरण प्रलंबित पडले. त्यामुळे संतापलेल्या बांगडेंनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठले आणि आंदोलनाला सुरुवात केली.


आमदार प्रशासनाच्या दारी!


सरकारकडून 'प्रशासन आपल्या दारी' ही योजना राबवली जात आहे. मात्र आपल्या मतदारसंघातील लोकांचे काम मंजूर होत नसल्याने आणि त्यांच्या फाइल शासकीय कार्यालयात धुळखात पडून असल्याने आमदार बागडे यांनी 'आमदार प्रशासनाच्या दारी' आंदोलन केलं. यावेळी त्यांनी तब्बल 8 तास पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोर  ठिय्या आंदोलन केले. तर जेवण देखील तिथेच केले. शेवटी जिल्हा परिषद सीईओ यांनी उद्या सर्व फाइल मार्गी लागतील असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच आंदोलन मागे न घेतल्यास मी स्वतः भेटण्यासाठी येतो असे सांगितल्यावर बागडे यांनी आपले आंदोलन मागे घेतलं.


एका दिवसांत 465 फायली मंजूर! 


पंचायत समितीमध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांनी विहिरीच्या फायली पूर्ण करण्यासाठी 8 तास ठिय्या आंदोलन केले होते. आमदार बागडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रात्री 12 ते 1 पर्यंत 150 फायली पूर्ण झाल्या होत्या. तसेच शुक्रवारी  दिवसभरात अनेक फायली पूर्ण झाल्या आहे. अशाप्रकारे एकूण 465 फायली पूर्ण झाल्या. सध्या गटविकास अधिकारी नसल्याने यावर स्वाक्षऱ्या बाकी आहे. तर येथील गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची रात्रीतूनच बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर संजय गायकवाड हे बीडीओ म्हणून रुजू झाले. ते या सर्व विहिरीच्या कार्यरंभ आदेशावर स्वाक्षऱ्या करणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जुगार अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करणाऱ्यावर चक्क विनयभंगाचा गुन्हा; संभाजीनगर पोलिसांचा 'हम करो सो कायदा'?