Aurangabad Adarsh Scam : औरंगाबादच्या (Aurangabad) आदर्श पतसंस्थेत तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी या आदर्श घोटाळ्यातील (Adarsh Scam) मुख्य आरोपी म्हणजेच पतसंस्थेतेचा अध्यक्ष अंबादास मानकापेला पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने अजब उत्तर दिले आहे. 'माझे वय झालं, काहीच आठवत नाही', असे म्हणत त्याने पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आणखी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 


काय म्हणाला मानकापे? 


गुन्हा दाखल होताच अंबादास मानकापे फरार झाला होता. मात्र अटकपूर्व जामीनीच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी तो शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या. दरम्यान मानकापेला ताब्यात घेतल्यावर त्याची पोलिसांनी चौकशी करत काही प्रश्न विचारले. मात्र, त्याने माझे वयच आता 82 वर्षाचे झाले, मला काही आठवतच नाही' असे अजब उत्तर दिले. परिणामी, पोलिसही अचंबित झाले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


कसा झाला घोटाळा? 


उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आल्याचे समोर आले. तसेच ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचे देखील यातून समोर आले. तर यात एकूण200 कोटींचा घोळ असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात शहरातील सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी (11 जुलै) रोजी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर अंबादास मानकापेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


रक्कम वाढण्याची शक्यता? 


उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात 200 कोटींचा घोळ समोर आला आहे. पण ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या जिल्हाभरात असलेल्या इतरही शाखांमध्येही घोटाळा झाल्याचा संशय आहे. पहिले लेखापरीक्षण हे तर टेस्ट ऑडिट होते. पतसंस्थेच्या इतर 40 शाखांमध्ये लेखापरीक्षण केल्यास आणखी घोळ समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी असे मुद्दे न्यायालयात देखील मांडले आहे. इतर शाखांची तपासणी, अन्य आरोपींचा शोध, इतके पैसे कुठे व कसे वळवले, गुंतवले या मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचे मुद्दे सुद्धा यावेळी मांडण्यात आली. त्यामुळे मानकापेला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या: 


Aurangabad Adarsh Scam : औरंगाबादेतील 'आदर्श घोटाळ्या'चा पहिला बळी; पतसंस्थेतील 22 लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने आत्महत्या