नागपूरः राज्यातील सत्तांतरानंतर मनसेने विदर्भातही आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी विदर्भ दौरा आखला (Raj Thackeray on Vidarbha tour) असून या अंतर्गत आज, मंगळवारी तब्बल 9 वर्षांनंतर राज ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी 2013 मध्ये आले होते. नागपूर (Nagpur) ते चंद्रपूर मार्गावर खांबाडा, वरोरा, पडोली आणि चंद्रपुरमध्ये मनसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आज येथे सकाळी सुमारे 9.30 वाजतापासून ते कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. 


नऊ वर्षांनंतर 'राज' दर्शन


चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील कार्यकर्ते 9 वर्षांनंतर आपल्या नेत्याला बघून उत्साहित झाले आहे. काल सायंकाळी येथील विश्रामगृहावर त्यांचे स्वागत करण्यात आले. विश्रामगृहाचा परिसर कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. 


शहरभरात पोस्टर्स


'आमचे साहेब आले, आमचे दैवत आले', असे फलक जागोजागी लागलेले आहेत. आज कार्यकर्ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी उत्सुक आहेत. मनसेच्या सर्व सेलमधील पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीसाठी जेथे ठाकरेंचा मुक्काम आहे, त्या हॉटेल एन.डी. कडे मार्गस्थ झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांचा हा उत्साह आगामी निवडणुकांमध्ये दिसणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी 'एबीपी माझा' कडे बोलून दाखविली. 


बैठकसत्रानंतर कार्यकारिणीमध्ये बदल?


काल चंद्रपूरला येण्यापूर्वी राज ठाकरे यांनी वरोरा येथे रमेश राजूरकर यांच्या घरी भेट दिली. रमेश राजूरकर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. आता यावळी ते मनसेकडून लढण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी वर्तविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून आमदार देण्याची तयारी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आजच्या बैठकांनंतर कार्यकारिणीमध्येही बदल केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


तरुणांना मनसेत संधी


राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी बैठका घेतला. महापालिका निवडणुकीचा आढावासुद्धा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली. घटस्थापनेनंतर नव्या कर्यकारिणीची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या मागचे कारण विचारले असताना विदर्भात अनेक होतकरू व युवा कार्यकर्ते आहेत, त्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी नव्या कार्यकारिणीत नव्या व जुन्यांचा समावेश केला जाईल, असे सांगून त्यांनी दिलासाही दिला. आज चंद्रपुरात कार्यकर्त्यांना ते काय संदेश देतील, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या