मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेत काही निर्णय देखील घेतले. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.


या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शिवसेना सेक्युलर झाली आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेक्युलर म्हणजे काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकाराला केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ त्यांच्या मदतीला धावून आले. यावेळी भुजबळ म्हणाले की, हा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे. आणि संविधानाच्या प्रस्तावनेत सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष शब्द आहे. तुम्ही संविधान वाचून घ्या, तुम्हाला कळेल या शब्दाचा अर्थ, असं म्हणून त्यांनी ठाकरेंची बाजू सावरून घेतली. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील संविधानात जे दिलं आहे तेच आहे, असं म्हणत विषयाला बगल दिली.

हे ही वाचा - 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... लेखक, कवी, उत्तम फोटोग्राफर ते मुख्यमंत्री, भन्नाट जीवनप्रवास  

उद्धव ठाकरेंनी पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठा निर्णय घेतला. रायगडच्या संवर्धनासाठी जवळपास 606 कोटींचं काम आहे. यासाठी 20 कोटी खर्च झाले आहेत, तर 20 कोटी रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांबाबतची येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेऊ, असा शब्दही उद्धव ठाकरेंनी दिला.

अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. आमची शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा होती, मात्र हातात काहीही नव्हत. मात्र आता राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत की, मागील सरकारने जे आदेश दिलेले त्यांचं वास्तववादी चित्र काय आहे? याबाबत माहिती द्या. शेतकऱ्यांना तुंटपुंजी मदत करायची नाही, त्यामुळे सर्व माहिती घेऊन त्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मी मुख्यमंत्री म्हणून जे आदेश दिलेत त्याला हवं तर श्वेतपत्रिका म्हणा किंवा काही म्हणा पण शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याबाबतचं वास्तव मला कळलं पाहिजे, यासाठी हे निर्देश दिले आहेत.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार असेल. राज्यात कोणालाही दहशत वाटेल असं वातावरण दिसणार नाही. देशातील नंबर एकच राज्य महाराष्ट्र करु आणि राज्याच्या वैभवात भर पडेल असं काम करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत राज्यातील जनतेला दिलं.
पदभार स्वीकारल्यावर काय करणार ठाकरे सरकार? महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर

'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'...उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची शपथ | ABP Majha