नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नेमके कुठले चाणक्य भारी पडत आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार बनवतायत म्हटल्यावर भाजपचे चाणक्य पराभूत झाले अशी टीका सुरु असतानाच एका रात्रीत सगळा खेळ बदलला. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपला सत्तेबाहेर करण्याचे प्रयत्न सुरु असताना मोदी-शाह गप्प का आहेत? याचं उत्तर अखेर आज मिळालं. शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार बनवण्याच्या चर्चेत मग्न असताना अचानक भाजपनं आपला प्लॅन बी समोर आणला आणि सकाळी सकाळी महाराष्ट्राला बातमी मिळाली ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याची. भाजपचं दिल्ली हायकमांड गेल्या काही दिवसांत कशी पावलं टाकत होते ते पाहुयात.


महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 4 नोव्हेंबरला मुख्यमंत्री दिल्लीत आले. महायुतीचंच सरकार येणार असं निकालानंतर ठासून सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलताना नवीन सरकार असा शब्द प्रयोग केला. त्या दिवशी ते अमित शाह यांना भेटून आले होते. विशेष म्हणजे याच दिवशी अजित पवारही दिल्लीत होते.

याच दिवशी शरद पवार-सोनिया गांधींची भेट घेणार होते, त्यासाठी सोबत म्हणून अजित पवार आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता दिल्लीतून निघणार होते, पण नंतर त्यांचा मुक्काम रात्री 11 पर्यंत लांबला. दरम्यानच्या काळात काही महत्वाच्या घडामोडी घडल्या असणार यात शंका नाही.

महाराष्ट्राच्या निकालानंतर अमित शाह गप्प होते. पण एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आव्हान केलं, ज्यांच्याकडे 145 चा आकडा आहे त्यांनी सरकार बनवावं. अमित शाह ज्या शैलीत हे बोलत होते, ते पाहता त्यात एक गंभीर आव्हान दडलेलं होतं.

शिवसेनेला सरकार स्थापनेचा प्रयत्न करु न देता भाजपला दुसऱ्या कुणासोबत सत्ता स्थापन करता आली असतीच. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण शिवसेनेला एक्सपोझ करण्यासाठी थोडं पुढे जाऊ देणं आवश्यक होतं. मुख्यमंत्रिपदासाठी प्रसंगी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जुळणी करायला सेनाही तयार आहे हे दाखवून सेनेला उघडं पाडायचा अमित शाहांचा प्लॅन असावा.

आज जे काही घडलंय, त्यात सगळ्यात मोठं गूढ आहे. ते पंतप्रधान मोदी-शरद पवार यांच्या भेटीचं. महाराष्ट्रातल्या ओल्या दुष्काळाचं कारण देत ही भेट झाली. पण त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चर्चा झाली हे नक्की. भाजपच्या प्लॅन बी ची कुणकुण पवारांना लागल्याशिवाय ही भेट झाली असेल यात काही शंका नाही. पण या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या सगळ्या चर्चा वेगानं झाल्या. अगदी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर सहमती झाली असं पवार जाहीरपणे म्हणाले. त्यामुळे पवार खरंच अंधारात होते की अजित पवारांना नादी लावू नका हे त्यांचं सांगणं धुडकावत मोदी-शाहांनी आपला प्लॅन तडीस नेला याचं उत्तर भविष्यात कळेल.

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढून, भाजपनं आता आपल्या शत प्रतिशतचा मार्ग मोकळा केला आहे. त्यात हे करताना सेनेकडे नैतिक बळ राहणार नाही यासाठी थोडासा वेळ घेऊन हे ऑपरेशन तडीस नेलंय. आता विधानसभेतल्या बहुमत चाचणीत काय नवे डावपेच खेळले जातात हे पाहणे महत्वाचं आहे.