नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सभागृहामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित यायला हवं, असं म्हटलं होतं. आज भाजप आणि अजित पवारांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. या घडामोडीनंतर एबीपी माझाशी बोलताना खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या की, राज्याच्या लोकांना कसा न्याय द्यायला पाहिजे हे पवारांनी नेहमी समोर ठेवलं आहे. काही बोलणी सुरू होती. त्यामुळेच मी हा ठामपणे हा विषय सभागृहात मांडला होता. गद्दारी भाजपने नाही तर शिवसेनेने केली आहे. मला वाटतं या निर्णयात शरद पवार सामील आहेत, असे राणा यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', ते त्यांनी करून दाखवले आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी नाही, तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सगळं समीकरण बिघडवलं असल्याचंही त्या म्हणाल्या. भविष्यात शिवसेना 100 टक्के फुटू शकते. याची सुरुवात भाजपने नाही तर शिवसेनेने केली असल्याचे देखील नवनीत राणा म्हणाल्या.

राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल आणि ते देवेंद्र फडणवीसच असतील, असा विश्वास नवनीत राणा यांनी 11 नोव्हेंबर रोजीच व्यक्त केला होता. विकासाच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत आणि सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल असंही त्या म्हणाल्या होत्या. पोरं ही पोरंच असतात, असा टोलाही त्यांनी त्यावेळी लगावला होता. भाजपचा मुख्यमंत्री होणे ही जनतेसाठी चांगली गोष्ट आहे. कारण केंद्रात आमची सत्ता आहे जर राज्यात आमची सत्ता असेल तर जनतेची कामं होतील. दोन्हीकडून बरोबरीचे सहकार्य मिळाले तर विकास होईल, म्हणून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी बसले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा


नवनीत राणा ह्या अमरावती लोकसभेच्या खासदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्या खासदार झाल्या. मात्र त्यांनी नंतर भाजपला समर्थन दिले. त्यांचे पती रवी राणा हे अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून आमदार आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

आज काय म्हणाल्या नवनीत राणा