बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहे. आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथून रवाना झालेले जरांगे आज धाराशिव (Dharashiv) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्याचा दौरा करणार आहे. पण, याचवेळी त्यांचे जागोजागी जोरदार स्वागत होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, बीडच्या (Beed) पाली गावात देखील त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. तर, यावेळी बोलतांना जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. "आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. 


दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "आरक्षणाला विरोध करणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. त्यांनी काहीही म्हटले तरी आम्हाला काहीच देणघेण नाही. त्यांनी सभा घेतल्या तरीही आम्हाला काहीच अडचण नाही. पण आरक्षण घेपर्यंत मराठा समाज एकत्र राहणार आणि आरक्षण मिळवणार. तर, सरकारने जागं व्हावं आणि मराठा समाजाला त्याच्या हक्काचे ओबीसीमधून आरक्षण द्यावे. राज्यातील प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. कारण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचे," जरांगे म्हणाले आहे. 


लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र 


मी समाजाचा लेकरू असून, त्यांच्यासाठी लढत आहे. आता नोंदी मिळत असून, मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाज सगळे कामं सोडून फक्त आता आरक्षणासाठी वेळ देत आहे. तर, आम्ही देखील सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार आहोतच. यासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज एकत्र येत आहे. ठिकठिकाणी लोकं थांबवून जे काही स्वागत करत आहेत, ती वेदना आहे मराठा समाजाची. जेसीबी लावून अंगावर फुलं टाकण्याचे मी सांगितले नाही, पण समाजाचे हे प्रेम आहे. नोंदी मिळाल्यानंतर राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता आमच्या लेकरांना न्याय मिळणार आहे. म्हणून हातातील सगळे कामं सोडून समाज आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र येत असल्याचे जरांगे म्हणाले आहे. 


तब्बल 70 वर्षांपासून मराठा समाजाचे वाटोळं


मी या समाजाचा मुलगा आहे, त्यामुळे ते आपल्या लेकरावर प्रेम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवणार असल्याचे मी सांगितले होते. त्यानुसार आता कुणबीच्या नोंदी सापडू लागल्या आहेत. मी काही उपकार केले नसून, मुलगा म्हणून आपल्या समाजासाठी प्रयत्न करत आहे. माझे हे कर्तव्य होते आणि तेच पार पाडत आहे. मराठा समाजाने जरी मला नेते म्हणून स्वीकारले असेल, पण मी स्वतःला कधीच नेता मानत नाही. मी फक्त सेवक आहे. नोंदी मिळाल्यापासून समाजात उत्साहाचे वातावरण असून, सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा आनंद आहे. तब्बल 70 वर्षांपासून मराठा समाजाचे वाटोळं करण्याचे काम झाले, असल्याचे देखील जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


भन्नाट ऑफर! मनोज नाव असलेल्या व्यक्तीला 'या' हॉटेलमध्ये मिळणार मोफत जेवण; मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला असाही पाठींबा