New Ashti Ahmednagar New Railway Line : बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी 'डेमू रेल्वे' सेवा आजपासून सुरु झाली आहे. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचा उद्घाटन समारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती दर्शवली. 


अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वे मार्गावरील चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे बीडवासीयांचं लक्ष लागले होतं. त्यानंतर आज बीडवासीयांचे स्वप्न अखेर पूण झालं आहे, असं म्हणावं लागेल.


या 261 किमी अंतराच्या या एकूण प्रकल्पापैकी अहमदनगर ते आष्टी या 67 किमी अंतरावर आजपासून डेमो रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्हावासीयांच्या स्वप्नपूर्तीकडे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. अहमदनगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी आज धावली. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत केला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी त्यांच्यासमोर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती.


आष्टी-नगर रेल्वे मार्गामुळे उद्योगधंद्याला चालना मिळणार


आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गामुळे व्यापारी वर्गाला मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. 


पाहा व्हिडीओ : आष्टी-नगर रेल्वेला हिरवा झेंडा



 


बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं अखेर उद्घाटन


नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा विषय कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. अनेक वेळा निवडणुकीवेळी हा मुद्दा चर्चेत आला मात्र, आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबितच होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. या मार्गावर रेल्वे धावण्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं  मोठं योगदान आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीडच्या रेल्वेमार्गासाठी अर्धा निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा झाली होती.