Ahemnagar Beed Parli Railway Line : बीड जिल्हावासियांच्या दृष्टीनं जवळच असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर उद्या पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत असून याचा शुभारंभ उद्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. यावेळी त्यांच्यासमोर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणार आहे.


परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचा प्रश्न कायम चर्चेचा विषय


अमहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा विषय कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुका सुद्धा या रेल्वे मार्गच्या प्रश्नाभोवती फिरताना पाहायला मिळाल्या आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. अगदी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना बीडच्या रेल्वेमार्गासाठी अर्धा निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा झाली होती. या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून भरीव तरतूद झालेली आहे.


उद्योगधंद्याला चालना मिळणार


आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच व्यापारी वर्ग यांना मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यामुळे उद्योगधंद्यास चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.


अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटर लांब


अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे अहमदनगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होतं.


उद्यापासून बहुप्रतिक्षित मार्गाचा शुभारंभ


अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल  परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. 1995 साली या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्तीअभावी या मार्गाचे काम रखडलं होतं. सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटीहून अधिक असून नगर ते आष्टी 60 किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे.


असा असेल नगर-आष्टी रेल्वे मार्ग


अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान सात किलोमीटर अंतरावर मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती नंतर अहमदनगर - नारायणडोह - सोलापूरवाडी या 15 कि.मी. अंतरावर 25 फेब्रुवारी 2019 रोजी सात डब्याची रेल्वे चाचणी झाली मात्र नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सोलापूर वाडी ते आष्टी 32 किमी अंतरावर 20 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आली.


नगर ते आष्टी रेल्वे मार्गावर सहा थांबे


अहमदनगर ते आष्टी 67 किलोमीटर अंतर असून या दरम्यान सदरील रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांची चढउतार करणार आहे. यामध्ये प्रथम नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी, धानोरा, कडा आणि आष्टी या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. आष्टी तालुक्यातील पाच आणि नगर जिल्ह्यातील एक स्थानकावर लवकरच तिकीट घर सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभ होणार आहे.