बीड : राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा (Gram Panchayat Election) कार्यक्रम जाहीर केला असून, बीड (Beed) जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे. यासाठी, 5 नोव्हेंबरला प्रत्यक्षात मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या वर्षात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आणि त्याचबरोबर नव्याने स्थापित झालेल्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. सोबतच, चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीसह रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंगळवारपासून हजार यासाठीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.


राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी 16 ते 20 ऑक्टोबर पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये अर्जाची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होणार असून, 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर, यामध्ये बीड जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतीचा समावेश असून, जिल्ह्यामध्ये आता निवडणुकीचे वातावरण रंगू लागल आहे. 


इच्छूक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण 


मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतमध्ये प्रशासकाकडून कारभार पाहिला जात होता. त्यामुळे काही प्रमाणात विकासाला देखील खीळ बसल्याचे चित्र होते. तर, निधी असून देखील विकासकामे होत नसल्यामुळे गावागावत वादाचे प्रसंग उद्भवत होते. निवडणुका जाहीर झाल्यामुळे पुन्हा एकदा गावांमधील वातावरण तापू लागले आहे. निवडणुका जाहीर झाल्यामुळे इच्छूक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


निवडणूक कार्यक्रम



  • 6 ऑक्टोबर अधिसूचना

  • 16 ते 20 ऑक्टोबर अर्ज दाखल करणे

  • 23 ऑक्टोबर छाननी

  • 25 ऑक्टोबर माघार

  • 5 नोव्हेंबर मतदान

  • 7 नोव्हेंबर मतमोजणी 


आता गावागावात प्रचार अन् बैठकांचा धुराळा...


ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीला अधिक महत्व असते. या निवडणुकीत इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. गावचा कारभारी होण्यासाठी अनेकदा चढाओढ पाहायला मिळते. त्यामुळे इच्छुकांकडून गावातील प्रत्यके मतदाराच्या घरी जाऊन मतांची मागणी केली जाते. प्रचार देखील केला जातो. विशेष म्हणजे यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जातात. यामुळे गावातील राजकारण अक्षरशः ढवळून निघते. अनेकदा यावरून वादाच्या घटना देखील समोर येत असतात. त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणूक गावकऱ्यांसाठी महत्वाची असल्याचे बोलले जाते.आता बीड जिल्ह्यात देखील ग्रामपंचायत निवडणुकांचा आखाडा रंगणार असून, प्रत्येक इच्छुक पहिलवान विजयाचा झेंडा फडकावण्यासाठी तयार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra: गावागावात गुलाल उधळणार; 2,359 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची तारीख ठरली!