बीड: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा  (Maratha Reservation)  वणवा आता राज्यभर पेटत असून बीडमध्ये (Beed) आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग (Dhule Solapur Highway) रोखला. या ठिकाणी आंदोलकांनी टायर पेटवून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र यामुळे महामार्गावरी वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. 


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला असून बीड शहरापासून जवळच असलेल्या बायपास रोडवर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केल आहे. महालक्ष्मी चौकामध्ये अचानक मराठा आंदोलन एकत्र आले आणि त्यांनी हा रस्ता रोको सुरू केला आहे. यामुळे वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत तर धुळे सोलापूरसह बीड शहरात जाणारी वाहतूक देखील ठप्प झाली आहे..


बीड परिसरातील काही गावातील हे आंदोलन असून आंदोलकांनी आत रस्त्यावर उतरायला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.


पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन...


मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात देखील गावागावात आंदोलन सुरु आहे. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली गावातील शत्रुघ्न काशीद या तरुणाने देखील आपल्या गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्याच्याकडून करण्यात आली.


पाण्याच्या टाकीवर चढल्यावर त्याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आपल्या मागणीवर ठाम राहिला. अखेर रात्रीच्या सुमारास त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. 


महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारा तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पाटोदा येथे आयोजित करण्यात आला होता. याची तयारी चालू असतानाच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी कार्यक्रम घेण्यास विरोध केला. पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारातच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साखळी आंदोलन सुरू आहे.  त्यामुळे हा कार्यक्रम पाटोदा कॉलेजमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, आंदोलकांनी कॉलेजमध्ये जाऊन हा कार्यक्रम बंद पाडला. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पाटोद्यात कोणताही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला.


ही बातमी वाचा :