बीड : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झालं असून यात बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता सुमारे 70.92 टक्के मतदान झाले. बीडमध्ये राज्यात सर्वाधिक मतदान झालं असल्याची नोंद समोर येते आहे. चौथ्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या बीडमध्ये कुणाची धाकधूक वाढणार हे आता 4 जून रोजी समजणार आहे. 


तिसऱ्या टप्प्यापर्यंत झालेल्या मतदानात उन्हामुळे राज्यात ठिकठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला असताना चौथ्या टप्यात मतदान करणाऱ्या बीडकरांनी मात्र उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानाला न जुमानता रेकॉर्ड ब्रेक 70.91 टक्के  मतदान करून  आपलं वेगळेपण जपलं आहे . सर्वाधिक बीडमध्य़े 70.91 टक्के तर नंदुरबारमध्ये 70.68 टक्के मतदानाची नोंद झाली. 


निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आणि अनेक मतदान केंद्रात दिवसभर मतदारांची गर्दी व रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी नऊ वाजेपर्यंत सात टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले होते . मात्र त्यांनतर लोक घराबाहेर पडले आणि  मतदारांच्या रांगा शहरी भागात मतदान केंद्रावर दिसत होत्या. अनेक ठिकाणी अपंग, वृद्ध उत्साहाने मतदान करताना दिसून आले. 


बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात 74.79 टक्के मतदानाची नोंद झाली. तर बीड 66.09 टक्के,  गेवराई 71.43 टक्के, केज 70.31 टक्के, माजलगाव 71.61टक्के, परळी 71.31 टक्के  विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. 


जिल्हा प्रशासनाने राबवलेली मतदार जनजागृती आणि राजकीय पक्षांनी मतदारांना घराबाहेर काढल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. या वाढलेल्या मतदानाचा टक्क्याचा कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल याची चर्चा येथे 4 जून पर्यंत राजकीय अभ्यासक आणि जाणकार मंडळी चवीने करत राहतील मात्र मतदारांनी आपलं काम चोख बजावलेल आहे हे नक्की.


बजरंग सोनवणेंची 19 ठिकाणी फेरमतदानाची मागणी


दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील परळीत बुथ कॅप्चर करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. अनेक पोलिंग एजंन्टसला गायब करण्यात आलं, मतदारांना मारहाण झाल्याचा आरोप करत त्यांनी 19 गावात फेरमतदान घेण्याचीही मागणी केली. 


बीड लोकसभेसाठी यंदा पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या चुरस दिसून आली असून मराठा आरक्षणाचा मुद्दा यावेळी चर्चेत आला होता. त्यामुळेच बीडमध्ये मराठा विरूद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याची चर्चाही जोरदार रंगल्याचं दिसतंय. 


ही बातमी वाचा: