Bajrang Sonwane : बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे हे दि. 22 एप्रिलला दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कुठलंही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय बजरंग सोनवणे यांनी घेतला आहे. 


त्यांचा अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील (Jayant Patil) तसेच शिवसेनेतील (Shiv Sena) एक मोठे नेते आणि रजनी पाटील (Rajni Patil) यांची उपस्थिती असणार आहे. तर बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते देखील बजरंग सोनवणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. बीडमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता 22 एप्रिल रोजी कुठलीही सभा घेणार नसल्याचे सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसेच पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्यावरदेखील जोरदार टीका केली आहे. 


खासगी विषयावर बोलाल तर जशास तसं उत्तर देईल


धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली होती. बजरंग सोनवणे हे कशाची शेती करतात हे पाहावं लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी कशाची शेती करतो हे धनंजय मुंडे यांनी माझ्या शेतात येऊन पाहिले आहे. ते जर माझ्या खासगी विषयावर बोलत असतील तर मला देखील खास गी विषयावर उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे त्यांनी खासगी विषयावर बोलू नये, असा इशारा बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. तर मी कोणाच्या इथे जाऊन काय बघितलं हे खासगी विषय मला इथे बोलायचे नाहीत, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.  


बजरंग सोनवणेंची प्रीतम मुंडेंवर जोरदार टीका


बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांनी केलेल्या विकासकामावर देखील प्रश्न उपस्थित केले. प्रीतम मुंडे दोन वेळा खासदार झाल्या आणि 261 किलोमीटर रेल्वेच्या कामामध्ये फक्त 99 किलोमीटर एवढेच रेल्वेचे काम झालं आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाकडून मिळाली असल्याचे सोनवणे म्हणाले. तर छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव हा राष्ट्रीय महामार्ग महाविकास आघाडीच्या काळात फक्त दोन वर्षात झाला. गेल्या दहा वर्षात प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यात कोणता रस्ता पूर्ण करून दाखवला हे त्यांनी सांगावं. बीड जिल्ह्यात खराब रस्त्यामुळे ज्या लोकांचे जीव गेले आहेत याला फक्त खासदार प्रीतम मुंडेच जबाबदार असल्याचं सोनवणे म्हणाले. बीड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची 90% काम अपूर्ण असून प्रीतम मुंडे यांनी एकही बैठक घेऊन ही कामे पूर्ण केली नाहीत. त्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार असून दोन वर्षात नगर परळी रेल्वेचे काम मी खासदार झाल्यावर पूर्ण करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 


आणखी वाचा 


तुम्ही पंकजा मुंडेंचा प्रचार करणार का? राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यानंतर प्रकाश महाजन यांचं रोखठोक उत्तर